सिंधुदुर्गातील धरणं फुल्ल !

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 17, 2024 13:58 PM
views 137  views

सिंधुदुर्गनगरी : दोन दिवसाच्या छोट्याश्या विश्रांती नंतर बुधवारी जिल्ह्यात ठिक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सुदैवाने कोठेही पूरस्थिती निर्माण झाली नव्हती. परंतु आंबोली येथे घाटात मोठा दगड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. आता पर्यंत १८ धरणे १०० टक्के भरली आहेत. तर तिलारी, कोर्ले सातंडी, देवधर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून या तिन्ही प्रकल्पातून १४२७८ क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे, नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या २४ तासात ४७.२ च्या सरासरीने पाऊस झाला आहे.

१५ ते १७ जुलै कालावधीत ऑरेंज अलर्ट दिला होता. पहिले २ दिवस जिल्ह्यात पावसाने थोडी उसंत घेतली होती. १७ जुलै रोजी सकाळ पासून पाऊस सुरू झाला आहे. बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस चालू आहे. सुदैवाने पूरस्थिती निर्माण झाली नव्हती. आंबोली येथे सकाळी मोठा दगड कोसळून रस्त्याच्या मधोमध असल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. छोटी वाहन बाजून जात होती. घटना स्थळी पोलीस हवालदार दत्ता देसाई,दादा शिंदे, पोलीस हवालदार प्रवीण सापळे ,महेंद्र बांधेकर पोचून मदतकार्य करत जेसीबीच्या सहाय्याने दगड बाजूला करण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

आज झालेल्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तिलारी, तेरेखोल, कर्ल्ली, गड, वाघोटन या प्रमुख नद्या आहेत. या नद्यांनी इशारा पातळी जरी ओलांडली तरी ग्रामीण भागात पुरसादृश्य स्थिती निर्माण होते. आज सुरू असलेल्या पावसामुळे सर्व नद्या इशारा पातळीच्या खालून वाहत आहेत त्यामुळे कोणताही प्रकारचा धोका उद्भवण्याची शक्यता फार कमी आहे. चालू पावसाळी हंगामात घरांची पडझड, गोठे नांगर दुकाने यांची मोठ्या प्रमाणात पडघर झाली आहे. शेती पाण्याखाली जाऊन त्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीचा आकडा हा पाच कोटीच्या बाहेर गेला आहे. मात्र ते लोक बाधित झाले आहे त्यांना जिल्हा प्रशासनाकडून जी अशी मदत देण्यात आलेली आहे. नुकसानग्रस्त भरीव मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. 

बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत झालेला पाऊस 

देवगड - ६०.४ मिमी, मालवण ३८.८  मिमी, सावंतवाडी ५५.३, मिमी, वेंगुर्ला ३८.८ मिमी, कणकवली ४७.७  मिमी, कुडाळ ४२.२ मिमी, वैभववाडी ४८ मिमी, दोडामार्ग ५४ मिमी पाऊस पडल्याची नोंद प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे.

धरणे भरली; पाण्याचा विसर्ग सुरु 

 तिलारी ,कोर्ले सातंडी, देवधर हे मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून त्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. अनुक्रमे ४ हजार १०७, ९ हजार ४४३, ७२८ असा मिळून १४२७८ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर 18 धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून यामध्ये शिवडाव, तरंदळे, आडेली, आंबोली, हातेरी, मांडखोल, सनमतेंबं, हरकुल, ओझरम, निळेली, पूळास, वाफोली, लोरे, शिरवल, धामापूर, वर्दे, ओसरगाव यांचा समावेश आहे.