
कणकवली : तुतारी एक्सप्रेस कणकवली स्थानकावर येण्याची वेळ झालेली असतानाच तिकीट रांगेत पुढे जाण्याचा प्रयत्न करण्यामध्ये दोन तरुणांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६.३० वा. सुमारास घडली.
मंगळवारी नागपंचमी असल्याने तुतारी एक्सप्रेसमधून मुंबईला जाणारे प्रवासी मोठ्या संख्येने कणकवली रेल्वेस्थानकावर होते. परिणामी तिकीट काऊंटरसमोरही मोठी रांग लागली होती. याच रांगेमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न एका तरूणाने केला. याचाच दुसऱ्या तरुणाला राग आला. याचाच परिणाम हाणामारीत झाला. परिणामी रेल्वेस्थानकावरील वातावरण काहीसे तणावग्रस्त झाले होते. पुढे रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मारामारी सोडवली.
दरम्यान कणकवली हे जिल्ह्यातील मध्यवर्ती रेल्वेस्थानक असल्याने येथे प्रवाशांची कायमच गर्दी असते. त्यामुळे येथे दोन तिकिट काऊंटरची आवश्यकता आहे. याबाबत पालकमंत्री नीतेश राणेंचे लक्ष वेधणार असल्याची माहिती तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुरेश सावंत व पदाधिकारी संजय मालंडकर यांनी दिली आहे.