उद्योगमंत्र्यांच्या धाडीनंतर एमआयडीसी अ‍ॅक्शन मोडवर

पाणी चोरणाऱ्या १२ सर्व्हिस सेंटरवर धडक कारवाई
Edited by: प्रतिनिधी
Published on: March 15, 2023 17:40 PM
views 199  views

मुंबई : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या डोंबिवली संदपगाव येथील धाडीनंतर एमआयडीसी अ‍ॅक्शन मोडवर आलीये. एमआयडीसीच्या पथकाने डोंबिवली ग्रामीण परिसरात एमआयडीसीच्या पाईप लाईनवर अनधिकृतपणे टॅपिंग करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केलीये.


काल दिवसभरात एमआयडीसीच्या पथकाने एमआयडीसीच्या पाईप लाईन अनधिकृतपणे टॅपिंग करणाऱ्या १२ सर्व्हिस सेंटरवर धडक कारवाई करत त्यांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. 


डोंबिवली येथील संदप गावात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी धाड टाकली. त्यानंतर डोंबिवली ग्रामीण भागातील अनधिकृत नळ जोडण्याचा प्रश्न हा समोर आला होता. उद्योग मंत्र्यांच्या धाडसत्रानंतर एमआयडीसी (MIDC) आणि कल्याण डोंबिवली (Dombivli) महानगर पालिका खडबडून जागी झालीये.


एमआयडीसीच्या पथकाने काल खेणि गाव ते काटई गाव नाका दरम्यान असलेल्या सर्विस सेंटरची पाहणी केली. यादरम्यान या रस्त्यालगत असलेल्या तब्बल 12 सर्विस सेंटरमध्ये एमआयडीसीच्या पाईपलाईनमधून अनधिकृतपणे टॅपिंग करून पाणी कनेक्शन घेण्यात आल्याचं निदर्शनास आलं.


हे अनधिकृत कनेक्शन कापून या पाणीचोरीबाबत एमआयडीसी प्रशासनाने या 12 सर्विस सेंटरविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. इथून पुढे देखील ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचं एमआयडीसी कडून सांगण्यात आलं.