वक्तृत्व स्पर्धेत युवा शक्तीचे परखड मतप्रदर्शन! ; रोहेकरांनी केले डॉ. सी. डी. देशमुखांचे विचारमंथन !

देशमुख यांचा जन्मदिन 'स्वाभिमान दिवस' म्हणून पाळण्याचा ठराव
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 17, 2023 17:33 PM
views 270  views

शशिकांत मोरे

रोहा  : संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देणारे रोह्या सुपुत्र स्व. डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त रोहा शहरातील राममारूती चौकात तालुक्यातील विविध युवक संस्थांच्या संयुक्त सहभागातून आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत युवा शक्तीने विविध विषयांवर परखड मतप्रदर्शनाबरोबरच डॉ. देशमुखांच्या अजरामर कार्याची उजळणी केली. यावेळी डॉ. सी. डी. देशमुख यांचा जन्मदिन 'स्वाभिमान दिवस' म्हणून पाळण्याचा ठराव ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके यांनी मांडला आणि उपस्थित रोहेकरांनी सर्वानुमते त्याला मंजुरी दिली.

रोहा तालुक्यातील सुराज्य प्रतिष्ठान, शिवचरण मित्रमंडळ, स्पंदन नाट्य संस्था, मावळा प्रतिष्ठान, राजमुद्रा फाऊंडेशन, श्रीकृपा फाऊंडेशन, रोटरी क्लब, अभिनव रोहा, रोटरॅक्ट क्लब, रोहा युवा आदी युवा संस्थांच्या सहयोगातून रोहा प्रेस क्लब आणि रोहा तालुका युथ फोरमच्या वतीने ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत खुल्या गटात भरत चौधरी प्रथम, केतन गुप्ता द्वितीय, अजित पाशिलकर तृतीय व अदिती थिटे बाहे हीने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले.

 लहान गटात श्रवण कदम (कोलाड) प्रथम, श्रीया साखिलकर (मेढा) द्वितीय, आकांक्षा चोळे (रोहा) तृतीय व अदिती वाटवे (रोहा) हिने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले.

अल्पावधीत आयोजन करण्यात आलेल्या या स्पर्धेत २३ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अध्यापक सुकुमार पाटील व अभ्यासू व्यक्तिमत्व अमित गुजर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके, मधुकर हातकमकर, प्रा. अतुल साळुंखे, रोहा सिटीझन फोरमचे अध्यक्ष नितीन परब, निमंत्रक आप्पा देशमुख, मकरंद बारटक्के, भाजपा युवक जिल्हाध्यक्ष अमित घाग, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष शशिकांत मोरे यांच्याहस्ते करण्यात आले. तर माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, संतोष खटावकर यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

    अशा वक्तृत्व स्पर्धांतून व्यक्तिमत्त्व विकासाची जडणघडण होते, त्यामुळे अशा स्पर्धा भरविल्या पाहिजेत, ते कृतीशील काम रोहा प्रेस क्लब, युथ फोरमच्या अनेक सहयोगी संस्था करीत आहेत, असे प्रा. अतुल साळुंखे यांनी स्पष्ट केले. यावेळी सुराज्य संस्थेचे रोषण चाफेकर, अभिनव रोहाचे हर्षद साळवी आदी युवा वक्त्यांनी विचार मांडले. स्पर्धेत युवा शक्तीने विविध विषयांवर परखड मतप्रदर्शन केले. निनाद शिंदे यांनी सूत्रसंचालन तर स्पर्धा समिती प्रमुख राजेंद्र जाधव यांनी आभार मानले.

      स्पर्धा यशस्वीतेसाठी रोहा प्रेस क्लब अध्यक्ष शशिकांत मोरे, सरचिटणिस नंदकुमार मरवडे, खजिनदार विश्वजीत लुमण, रवींद्र कान्हेकर, सागर जैन, विनीत वाकडे, रोशन चाफेकर, हाजी कोठारी, दिनेश जाधव, पल्लवी पोटे, आकाश रुमडे, मयुर धनावडे, अॅड. हर्षद साळवी, अमित कासट, उमेश वैष्णव, सिद्देश ममाले, किरण कानडे, विष्णू तिवारी, प्रतिक राक्षे, चेतन कोरपे, वैभव आठवले, समीर पेणकर आदींनी परिश्रम घेतले.


डॉ. देशमुख यांचा जन्मदिन स्वाभिमान दिवस म्हणून पाळण्याचा ठराव

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र असावे, मुंबईला केंद्रशासित प्रदेश करू नये, या मागणीसाठी डॉ. सी. डी. देशमुख यांनी आपल्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. अशा आदर्श नेत्याचा, आदर्श व्यक्तिमत्वाचा जन्मदिवस 'स्वाभिमान दिन' म्हणून पाळण्यात यावे, असा ठराव या समारोप सत्रात ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके यांनी मांडला. त्याला आप्पा तथा प्रदीप देशमुख यांनी अनुमोदन दिले. यावेळी उपस्थित सर्व रोहेकर नागरिकांनी आपले हात वर करून या ठरावाला समर्थन दिले. याविषयी शासनाला रोहेकर नागरिकांच्या सह्यांचे पत्र देण्यात येणार आहे.