दोडामार्ग : महिला सक्षमीकरण ही काळाची गरज असून जर ग्रामीण भागात महिला उद्योजक बनल्या, महिलांनी स्वयं व्यवसाय सुरू केला तर कुटुंबाची आर्थिक स्थिती उंचावेल. यासाठी ग्रामपंचायतने दिलेल्या व्यवसाय प्रशिक्षणाचा स्वयंरोजगार निर्मितीसाठी उपयोग करावा व आपली आणि कुटुंबाची उन्नती साधावी असे आवाहन पीकुळे गावचे अभ्यासू सरपंच आप्पा गवस यांनी केलं आहे.
त्यांच्याच संकल्पनेतून ग्रामपंचायत अंतर्गत 15 विक्त आयोग मधून घेण्यात आलेल्या विकास प्रशिक्षणाचा गावातील तब्बल 40 माहीलांनी लाभ घेतला. या महिलांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. महिलांना पापड, केक व मसाले उद्योग बाबत हे प्रशिक्षण घेण्यात आले होते. पहिल्यांदाच इतक्या प्रभावीपणे घेण्यात आलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचे महिला वर्गातून स्वागत करण्यात आले.
हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या महिलांना सरपंच, ग्रामसेवक, सदस्य आदींच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच आप्पा गवस, उप सरपंच निलेश गवस, ग्रामसेविका नम्रता राणे, सदस्य रामा नाईक, रत्नदीप गवस, शंकर गवस, योगीता सावंत, निशा गवस, गीरीजा गवस, रुक्मिणी गवस, जयवंती न्हावी आदी उपस्थित होते. या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या महिलांनी व्यवसायाकडे वळावे, स्वतः च्या पायावर उभं रहावं, असं आवाहन सरपंच आप्पा गवस यांनी याप्रसंगी केल आहे. भविष्यातही गावच्या महिला सक्षमीकरण व गावच्या सर्वांगीण विकासासाठी असेच विविधांगी उपक्रम राबविले जातील असा मनोदय ही त्यांनी या प्रमाणपत्र वाटप प्रसंगी व्यक्त केला आहे.