सावंतवाडी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा ठाकरे शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत शहरातून मशाल पदयात्रा काढण्यात आली. सायंकाळी सावंतवाडी गवळी तिठा येथून मशाल पदयात्रा काढण्यात आली.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, आमदार वैभव नाईक, शरद पवार राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, अँड. दिलीप नार्वेकर, शैलेश परब, अर्चना घारे-परब, पुंडलिक दळवी,साक्षी वंजारी, समीर वंजारी, बाळा गावडे, जान्हवी सावंत, संजय पडते,रूपेश राऊळ, मायकल डिसोझा आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कोकणात शिवसेना वाढली, कोकणनं मुंबईतही शिवसेना वाढविण्यास सहभाग घेतला. कोकण आणि बाळासाहेब ठाकरे यांचे अनोखे नाते होते. बाळासाहेब ठाकरे यांचे कोकणावर नितांत प्रेम होते. त्यामुळे आत्ताच्या निवडणूकीत पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनाच येथील जनता पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आणेल. जे कोण बाळासाहेबांचीच खरी शिवसेना असे सांगत होते त्यांनी कोकणात आता निवडणूक का लढवली नाही का पळ काढला ? त्यामुळे त्यांना खरी शिवसेना म्हणण्याचा अधिकार नाही. आमच्यावर आरोप करत आहे त्यांनीच कोकणातून शिवसेना हद्दपार केली. त्यामुळे त्यांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार नाही असं मत युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी व्यक्त केले.