
वैभववाडी : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दि. १ जुलै रोजी ग्रामपंचायत करूळ, पंचायत समिती वैभववाडी व कृषी विभाग वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने करुळ येथे कृषी दिन व कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी कृषी दिंडी पार पडणार आहे. या मेळाव्यास वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील, पंचायत समिती गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख, भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रसाद देवधर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्त करुळ येथे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी ९:३० वाजता कृषीदिंडी काढण्यात येणार आहे. या दिंडीमध्ये गावातील वारकरी सांप्रदायातील मंडळी, शेतकरी, विद्यार्थी, कृषी कन्या सहभागी होणार आहेत. रानभाज्या व जुन्या अवजारांचे प्रदर्शन यावेळी करण्यात येणार आहे.
कार्यक्रमप्रसंगी मागील हंगामात तालुक्यात भात पीक स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच प्रगतशील शेतकरी यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रा .विवेक कदम, प्रा. तेजस गायकवाड हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पारंपारिक व आधुनिक पद्धतीने भात लावणी प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तरी या मेळाव्याला तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, प्रोड्युसर कंपनीचे प्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करुळ सरपंच नरेंद्र कोलते यांनी केले आहे.