
वैभववाडी : तालुक्यात अवकाळी पावसाने आज सायकांळी हजेरी लावली. तालुक्यातील अनेक गावांना चांगलेच झोडपुन काढले. या पावसामुळे नागरिकांची ताराबंळ उडाली. अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदार चिंतातूर झाले.
जिल्हयात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण आहे.थंडीही गायब झाली आहे. वातावरणात झालेल्या या बदलामुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊसही बरसत आहे.सावंतवाडी, कुडाळ ,कणकवली या तालुक्यात गेल्या दोन दिवसांत पाऊस बरसला होता.यापाठोपाठ आज वैभववाडीत जोरदार पाऊस झाला.दरम्यान आज सकाळपासुन तालुक्यात ढगाळ वातावरण होते.सायकांळी सहा वाजता अचानक काही गावांमध्ये हलक्या पावसाला सुरूवात झाली.काही वेळ हलका पाऊस सुरू होता.त्यानंतर मात्र पावसाचा जोर वाढला.सरीवर सरी कोसळु लागल्या.वैभववाडी,एडगाव,कोकिसरे,नाधवडे,सोनाळी,सांगुळवाडी या भागाला अवकाळीने चांगलेच झोडपुन काढले.अर्धा ते पाऊणतास पावसाच्या सरी कोसळत होत्या.अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
गेल्या काही दिवसांपासुन तालुक्यात असलेले ढगाळ वातावरण आणि पडत असलेला अवकाळी पाऊस यामुळे जिल्हयातील आंबा,काजु पिकांवरील संकट अधिक गडद होवु लागले आहे.या पावसामुळे आंबा,काजु पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतकऱी चिंताग्रस्त झाला आहे.