मालवण : जनतेशी नाळ जुळलेला आमदार अशी वैभव नाईक यांची ओळख आहे. त्यामुळे कोणत्याही पदासाठी अन्य विरोधीपक्षातील नेत्यासमोर आमदार झुकले नाहीत आणि झुकणारही नाहीत. जनतेचे सेवक म्हणून काम करणारे आमचे आमदार २०२४ ला विजयाची हॅट्रिक करतील. त्यामुळे भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी आपल्या पक्षाचे कोण उमेदवार पराभूत होणार त्याची काळजी करावी असा पलटवार ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केला आहे.
विधानपरिषद हवी असेल तर मंत्री राणे, चव्हाण, केसरकर यांच्याशी जुळवून घ्या असा सल्ला देणाऱ्या भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्यावर हरी खोबरेकर यांनी प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे. खोबरेकर म्हणाले, आमदार वैभव नाईक हे केवळ जनतेसमोर झुकतात. हीच शिकवण बाळासाहेबांनी आम्हाला दिली. स्वार्थासाठी सत्तेसाठी आमदार झुकणार नाहीत. आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांच्यासह सर्व निष्ठावंत पुन्हा जनतेतूनच निवडून येणार.
राहिला प्रश्न विधानपरिषद आमदारकीचा. तर त्याचा विचार आपल्याच नेत्यांनी करावा. २०१४ निवडणूकित आमचे आमदार विजयी झाले. त्यामुळेच आपल्या नेत्यांना त्यानंतर विधानपरिषद व राज्यसभा याठिकाणी जावे लागले. स्थापन केलेला पक्ष का विसर्जित करावा लागला. याचा विचार आधी करा नंतरच विधानपरिषद आमदारकीवर बोला. आरोप प्रत्यारोप करून राजकारण करणे यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवणे हे आमचे कर्तव्य असल्याचे खोबरेकर म्हणाले.