फळपीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चतुर्थीपूर्वी नुकसान भरपाई द्या

वैभव नाईक यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 08, 2024 10:58 AM
views 190  views

सिंधुदुर्गनगरी : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२३-२४ करिता विमा नुकसान भरपाईची रक्कम  शेतकऱ्यांना गणेश चतुर्थीपूर्वी मिळावी अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. यावर कृषिमंत्री मुंडे यांनी कृषी विभागाचे अवर मुख्य सचिव यांना सदर बाबतीत प्रस्ताव सादर करावा असे आदेश दिले आहेत. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

कृषी मंत्र्यांना दिलेल्या पत्रात आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे की, पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२३-२४ करिता सिंधुदुर्ग जिल्हयातील ४२,१९० आंबा काजू बागायतदार शेतक-यांनी फळपिक विमा योजनेत सहभाग घेवून १९.९११.०० हेक्टर क्षेत्र संरक्षित केले आहे. १८ जून २०२१ रोजीच्या शासन निर्णयामध्ये हवामान धोका संपल्यानंतर आणि राज्य व केंद्र शासनाकडील विमा हिस्सा रक्कम विमा कंपनीला प्राप्त झाल्यानंतरच तीन आठवडयात विमा नुकसान भरपाई वितरणाची कार्यवाही विमा कंपनीकडून करण्यात येते. अशी शासन निर्णयामध्ये तरतुद आहे.

गतवर्षी म्हणजेच सन २०२२-२३ ची विमा नुकसान भरपाई माहे नोव्हेंबर, २०२३ अखेर विमा कंपनीकडून वितरीत करण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी गणेश चतुर्थी अगोदर सन २०२३-२४ ची नुकसान भरपाई सिंधुदुर्ग जिल्हयातील पात्र बागायतदार शेतक-यांना विमा कंपनीकडून मिळणेबाबत कार्यवाही व्हावी अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.