वैभववाडी : सीमेवर देशाचं रक्षण करणा-या सैनिकांना कोकीसरे नारकरवाडी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ७५ राख्या पाठवल्या आहेत. यासोबतच पोस्ट कार्डवरती त्यांच्यासाठी शुभ संदेश लिहून तो पाठविण्यात आला आहे. शाळेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
येत्या बुधवारी ३० ऑगस्टला देशात रक्षाबंधन सण साजरा होणार आहे. यानिमित्ताने देशाच्या सीमेवर देशवासीयांचे रक्षण करणा-या सैनिकांना कोकीसरे येथील विद्यार्थ्यांनी राख्या पाठवल्या आहेत. शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने एक राखी व पोस्ट कार्डवरती सैनिकांसाठी शुभ संदेश लिहून सैनिकांच्या दिल्ली येथील मुख्यालयात पाठविला आहे. सैनिकांप्रति विद्यार्थ्यांचा मनात आदरभाव निर्माण व्हावा या उद्देशाने प्रशालेने हा उपक्रम राबविला.या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक संजयकुमार शेट्ये, शिक्षिका संपदा बागी, गीता टक्के, वैशाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.