
चौकुळ : लग्नसमारंभात होणारा बडेजाव, अनावश्यक खर्च आणि त्यामुळे पालकांवर येणारा आर्थिक ताण टाळण्यासाठी चौकुळ ग्रामपंचायतीने आदर्शवत पाऊल उचलले आहे. पालकांच्या संमतीने सामुदायिक किंवा नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्या जोडप्यांना दहा हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
हा निर्णय येत्या आर्थिक वर्षापासून लागू होणार असून, युवक-युवतींनी साधे, सुयोग्य आणि कर्जमुक्त लग्न करण्यास प्रोत्साहन देणे हा ग्रामपंचायतीचा हेतू असल्याचे सरपंच गुलाबराव गावडे यांनी सांगितले. तसेच हा निर्णय इतर ग्रामपंचायतींनीही आदर्श म्हणून अमलात आणावा, असे आवाहन त्यांनी केले.
ग्रामसभेत ग्रामपंचायत अधिकारी अमित राऊळ, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाळाभाई गावडे, सोसायटी चेअरमन पांडुरंग गावडे, उपसरपंच आरती जाधव, माजी सरपंच विजय गावडे, तसेच ग्रामपंचायत सदस्य संजना गावडे, मेघा मेस्त्री, वैष्णवी गावडे, अभिजीत मेस्त्री, आणि ग्रामस्थ बापू गावडे, अर्जुन गावडे, रुपेश गावडे, अमोल गावडे, अविल गावडे आदी उपस्थित होते.










