रत्नागिरी : निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवून शिवसेना हे नावही वापरता येणार नाही, असा निर्णय दिल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलून जाणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाचा आपआपसात संघर्ष सुरू असून स्थानिक पातळीवरही कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशातच रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारी मंत्री उदय सामंत यांनी आमदार भास्कर जाधव यांना धक्का दिला. जाधव समर्थक पदाधिकाऱ्यांनी उदय सामंत यांच्या उपस्थितीत काल शिंदे गटात प्रवेश केला आहे.
गुहागर येथील तरुण नेते रोहन भोसले यांनी आपल्या समर्थकांसह शनिवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी गुहागर नगरपंचायतीचे बांधकाम सभापती अमोल गोयथळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते शिंदे गटामध्ये सामील झाले. तसंच सदानंद पवार - धोपावे सरपंच, संतोष सावरकर -कोळवली सरपंच यांनीही शिंदे गटाची वाट धरली. आगामी काळात भास्कर जाधव यांना राजकीय शह देण्यासाठी शिंदे गट आक्रमकपणे प्रयत्न करणार असल्याचे समजते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आमदार भास्कर जाधव काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लवकरच कोकण दौरा होण्याची शक्यता आहे. या दौऱ्याआधी आपल्या गटाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न उदय सामंत यांच्याकडून सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून गुहागर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी भास्कर जाधव समर्थक शिवसेना पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात खेचण्यात येत आहे.