बांदा : वडील ओरडल्याच्या रागातून दोन शाळकरी भाऊ घर सोडून गेल्याची घटना घडली आहे. याबाबत वडिलांनी बांदा पोलिसात बेपत्ताची तक्रार दाखल केली आहे. मोठा मुलगा सिंगनिया कुमार (वय १६) व त्याचा लहान भाऊ हसमुख कुमार (वय १४) अशी बेपत्ता झालेल्या भावांडांची नावे आहेत. याबाबत वडील बाबुराव चौहान यांनी तक्रार दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, बाबुराव चौहान यांचे बांदा शहरात चपलाचे दुकान आहे. ते गोव्यातून दुकानात आले असता दोन्ही भावंडे मस्ती करत होती. त्यावेळी वडील रागावले व दोघांना घरी जाण्यास सांगितले. मात्र एक तासानंतर त्यांची पत्नी घरी गेली असता दोन्ही भावंडे घरी आढळून आली नाहीत. त्यांनी याची कल्पना पतीला दिली. आज दिवसभर त्यांची बांदा शहरात शोधाशोध करण्यात आली. मात्र ती कुठेही सापडली नाहीत. त्यामुळे बांदा पोलिसात बेपत्ताची तक्रार दाखल करण्यात आली.