गाड्या आहेत पण थांबतच नाही | एसटी विभागाचा अजब कारभार

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 02, 2024 13:08 PM
views 387  views

वैभववाडी : भुईबावडा मार्गे कोल्हापूरकडे  जाणा-या एसटीच्या सर्व जलद गाड्या उंबर्डे, भुईबावडा येथे थांबतच नाही.रुटमध्ये थांबा असूनही या गाड्या थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत.एसटी विभागाच्या या कारभारामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

करुळ घाटात रस्ता नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने सध्या घाट वाहतुकीसाठी बंद आहे.त्यामुळे कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात एसटीची होणारी वाहतूक सध्या भुईबावडा घाटातून सुरू आहे.जिल्ह्यातील विविध आगारातील १६ गाड्या या मार्गाने ये -जा करीत आहेत.या गाड्यांचा कुसूरबाजारवाडी भुईबावडा असा रुट आहे.परंतू या मार्गावरील कुसूर , उंबर्डे व भुईबावडा येथे या गाड्या थांबतच नाही.त्यामुळे या भागातून जाणाऱ्या या गाड्यांचा येथील स्थानिक प्रवाशांना कोणताही फायदा होत नाही.एसटीची वाहतूक सुरू असूनही गैरसोय सहन करावी लागत आहे. याबाबत एसटीच्या चालक-वाहकांचे असे म्हणणे आहे, तिकीट यंत्रात हे नविन थांबे समाविष्ट करण्यात आले नाहीत.त्यामुळे या थांब्यावर गाड्या थांबवता येत नाही.