
आचरा : आचरा कणकवली मार्गांवरील त्रिंबक बगाडवाडी भर दिवसा चोरट्यांनी डल्ला मारला आहे. केंद्र प्रमुख राजेंद्र प्रसाद गाड यांच्या घराचा मागील दरवाजा फोडून चोरट्यांनी घरातील कपाटे फोडून अंदाजे पंचवीस हजार रुपये रक्कम आणि कपाटातील बनावट दागिने घेऊन लंपास झाले. भर दिवसा झालेल्या या घटनेमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
गुरुवारी सकाळी साडे आठच्या दरम्यान सौ रुचिरा गाड या बैठकीला तर पावणे नऊच्या सुमारास राजेंद्र प्रसाद गाड शाळेत गेले होते. याचा फायदा घेऊन चोरट्यांनी घराचा मागिल दरवाजा फोडून घरात प्रवेश केला. बैठकीवरून सकाळी अकराच्या सुमारास घरीआलेल्या रुचिरा गाड यांच्या हि घटना निदर्शनास आली. त्यांना घराचा मागिल दरवाजा उघडा दिसला. तसेच घरातील दोन्ही कपाटे फोडून सर्व सामान अस्ताव्यस्त पसरल्याचे दिसून आले.
याबाबत पोलीस पाटील सिताराम सकपाळ यांनी आचरा पोलीस स्टेशनला खबर देताच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार, उप निरीक्षक चोरगे, पोलीस कर्मचारी मनोज चव्हाण, महिला पोलीस कर्मचारी तांबे घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्रिबक सरपंच किशोर त्रिंबककर, उपसरपंच आशिष बागवे, ग्रामसेविका माधुरी कामतेकर, तलाठी शेजवळ, पोलीस पाटील सिताराम सकपाळ, सारंगी चव्हाण, गणेश गोसावी, सिमा घाडीगांवकर, आचरा पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, विठ्ठल धुरी यांसह ग्रामस्थ उपस्थित झाले होते. पोलीस पाटील व ग्रामस्थांनी घराच्या आजूबाजूचा परीसरात शोध घेतला होता पण चोरटे आढळून आले नाहीत. चोरटे दगडी कंपाऊंड वरुन उडी मारुन आल्याचा घराच्या पॅसेजमध्ये लागलेल्या ओल्या मातीवरुन अंदाज व्यक्त केला जात होता. यात महिला आणि पुरुष चपल्लांचे ठसे असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात होते. भर दिवसा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे आचरा परीसरात मात्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.