नारीशक्तीला स्वतंत्र ओळख देण्याचं मराठा समाज उत्कर्ष मंडळाचं कार्य कौतुकास्पद

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब यांनी केलं कौतुक
Edited by: विनायक गांवस
Published on: February 20, 2023 18:39 PM
views 162  views

सावंतवाडी : जिजाऊ आदर्श महिला पुरस्कार देऊन .महिलांचा सन्मान करण्याची पद्धत मराठा समाज उत्कर्ष मंडळांन आखून पाच महिलांचा जो काही गौरव सन्मान केला, हे कार्य खरंच वाखाण्याजोगे आहे. महिलांनी आता कुटुंब वात्सल्याबरोबरही समाजसेवा, राजकारण आणि संघटनात्मक कार्यात अग्रेसरपणे पुढे यायला हवे. नारीशक्तीला वेगळे स्थान देण्याचे कार्य अशा सन्मानाने गौरवातून मराठा समाज करत आहे, असे मत अर्चना फाउंडेशनच्या अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी व्यक्त केले.

मराठा समाज उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील पाच मुलांना शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेतले. जाईल आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आचार अशा कार्यातून आचरणात आणले जातील. अशी ग्वाही मंडळाचे अध्यक्ष संजू परब यांनी दिली. 


सावंतवाडी दोडामार्ग मराठा समाज उत्कर्ष मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने जिजाऊ आदर्श महिला सन्मान पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंडळातर्फे पाच जिजाऊ आदर्श महिला पुरस्कारासाठी निवडण्यात आल्या होत्या त्यामध्ये अर्चना घारे परब, सुजल सुनील राऊळ, भक्ती भूपेंद्र सावंत, गौरी परब माजगाव, सरपंच डॉक्टर अर्चना सावंत या पाच महिला समाजामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. त्यामुळे या महिलांचा शाल श्रीफळ देऊन मंडळाचे अध्यक्ष संजू परब व महिला अध्यक्ष संजना परब यांच्या हस्ते गौरव सन्मान करण्यात आला. 


यावेळी सत्काराला उत्तर देताना सौ घारे पुढे म्हणाल्या, या मंडळाने माझा शालेय जीवनात असताना सत्कार केला होता आणि आता जिजाऊ आदर्श महिला पुरस्काराने माझा गौरव केला आहे महिलांनी समाज सेवेमध्ये यायला हवे मराठा समाज उत्कर्ष मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे या मंडळाने महिलांचा जो सन्मान केला आहे ही प्रथा कायम ठेवावी आणि पुढील वर्षी 100 महिलांचा सत्कार करून एक वेगळा उपक्रम राबवावा. 


यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजू परब म्हणाले, मराठा समाज उत्कर्ष मंडळातर्फे सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील पाच विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक दृष्ट्या प्रगत केले जाईल, असा उपक्रम राबविण्यात येणार आहे.


यावेळी प्रास्ताविक, पुरस्कार विजेत्यांचा परिचय मंडळाचे सचिव ॲड. संतोष सावंत यांनी तर सूत्रसंचालन मेघना राऊळ यांनी केले व्यासपीठावर महिला मंडळाच्या अध्यक्ष संजना परब, सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे महाव्यवस्थापक सुनील राऊळ, मंडळाचे उपाध्यक्ष पंढरी राऊळ, दत्ता सावंत, खजिनदार भूपेंद्र सावंत, सहसचिव विनोद सावंत, उज्वला सावंत, अभिमन्यू लोंढे, भरत गावडे आदी उपस्थित होते.