पावसाचा फटका ; विद्युतपुरवठा अद्यापही नाही सुरळीत

Edited by: विनायक गांवस
Published on: May 21, 2025 14:46 PM
views 202  views

सावंतवाडी : तालुक्यात मंगळवारी दुपारनंतर कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फटका वीज वितरणला बसला. वादळी वाऱ्यामध्ये कोसळलेल्या झाडात विद्युत पोल तुटून पडल्याने तब्बल सात ते आठ लाखाचे नुकसान झाले. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरातील बत्ती गुल झाली होती. बुधवारी दुसऱ्या दिवशीही काही गावातील विद्युत पुरवठा सुरळीत होऊ शकला नव्हता.

तालुक्यात मंगळवारी पूर्व मोसमी पावसाने हाहाकार उडवला. शेतकरी, बागायतदार, व्यापारी वर्ग तसेच अन्य यंत्रणेलाही या पावसाचा फटका बसला. यामध्ये वीज वितरण कंपनीलाही चांगलाच नुकसान सोसावे लागले. सावंतवाडी शहरामध्ये हा आकडा फार मोठा आहे. यामध्ये भडवाडीत आंब्याचे झाड कोसळून ते विद्युत लाईनवर पडल्याने तब्बल सात पोल यामध्ये मोडले. तर शहरातच माठेवाडा भागात पाच आणि एल पी पोल पाच, एका डीपीचेही नुकसान झाले. जवळपास शहरातील हा नुकसानीचा आकडा पाच लाखाच्यावर आहे. यामुळे सावंतवाडी शहरातील विद्युत पुरवठा पूर्णतः खंडित झाला होता‌.

रात्री उशिरा हापुरवठा सुरळीत करण्यात वीज वितरण कंपनीला यश आले. मात्र, ग्रामीण भागातील वीज पुरवठा दुसऱ्या दिवशीही खंडित होता. ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वीज वितरणला चांगलाच फटका बसला. बांदा, वाफोलीमध्ये एक तर कोलगाव मध्ये दोन पोल तुटून पडल्याने साधारण सात ते आठ लाखाला फटका बसला. पहिल्याच पावसात वीज वितरणचा कारभार समोर आला.


विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अनेकांना विविध समस्यांचा सामना करावा लागला. ग्रामीण भागात तर दुसऱ्या दिवशीपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास विज वितरण कर्मचाऱ्यांना अपयश आले. ठिकठिकाणी मेन लाईनवर फॉल्ट असल्याने तो सुरळीत करण्यास अडचणी येत होत्या असे विज वितरणचे उपअभियंता शैलेश राक्षे यांनी सांगितले. ग्रामीण भागातील काही गावांचा विद्युत पुरवठा दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत सुरळीत करण्यात आला होता. तर बऱ्याच गावातील विद्युत पुरवठा सायंकाळपर्यंत सुरू करण्यात अडचणी आल्या होत्या. पहिल्याच पावसात झालेल्या या दैनेमुळे महावितरणच्या या  कारभाराबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली.