
सिंधुदुर्गनगरी : विश्व संवाद केंद्र मुंबई यांच्यातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान सोहळा २०२६ या वर्षी चिपळूण येथे होत आहे. या सोहळ्यामध्ये कोकण विभागातील पाच पत्रकारांना यंदा सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती विश्र्व संवाद केंद्र मुंबईचे धोरणात्मक प्रमुख निशिथ भांडारकर यांनी दिली आहे.
डॉ. निशिथ भांडारकर यांनी सांगितले की, दरवर्षी भारतीय मूल्ये, सत्यनिष्ठा आणि राष्ट्रहितासाठी समर्पित पत्रकारितेला प्रोत्साहन देण्यासाठी विश्र्व संवाद केंद्रातर्फे देवर्षी नारद पुरस्कार देवून माध्यमांमधील पत्रकारांना गौरविण्यात येते. त्रिस्तरीय निवड समितीच्या माध्यमातून पत्रकारांची निवड होत असल्याने या पुरस्कारांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. यावर्षी ज्येष्ठ पत्रकार म्हणून रायगडमधील मेघराज जाधव यांना गौरविण्यात येणार आहे. मुद्रित माध्यमामध्ये उत्कृष्ट कार्य करणारे पत्रकार म्हणून शेखर सामंत, सिंधुदूर्ग, समिर जाधव व मयुरेश पाटणकर रत्नागिरी आणि युट्यबर व सामाजिक माध्यमात प्रभावी कार्य करणारे ऋषभ तोडणकर सिंधुदुर्ग यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, 02 मे 2026 रोजी सायंकाळी 5.30 ते 8.00 या वेळेत नवनोकण एज्युकेशन सोसायटीचे सभागृह, डी.बी. जे. कॉलेज चिपळूण येथे होणार आहे. या सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार राजेश जोष्टे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सुप्रसिद्ध विचारवंत, संशोधन व लेखक श्री. अभिजीत जोग हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतील. यावेळी जय महाराष्ट्र न्यूज चॅनल चे संपादक प्रसाद काथे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
पत्रकारिता हा केवळ माहिती पोहोचवण्याचे साधन नसून तो राष्ट्रनिर्माणाचा एक बळकट आधारस्तंभ आहे. असा विश्व संवाद केंद्राचा विश्वास आहे. याच भावनेतून निर्भीड आणि तथ्यांवर आधारित पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना हे व्यासपीठ दरवर्षी गौरवते. या सोहळ्याला रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक, पत्रकार, लेखक, साहित्यिकांनी आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी डॉ. भांडारकर यांनी केले.










