सावंतवाडी : दीर्घ विश्रांतीनंतर जोरदार सुरू असलेल्या पावसाचा फटका न्हावेली-पाडलोस रस्त्यावरील केणीवाडा येथे असलेल्या मोरी पुलाला बसला. पुलाच्या एका बाजूने चार फुटी भगदाड तर दुसऱ्या बाजूने भराव कोसळत असून पुल वाहतुकीस धोकादायक बनले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस केणीवाडा येथे मोरीपुलाचे काम पूर्ण होऊन एक महिन्यांचा कालावधी उलटला. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पुल खचल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. नवख्या वाहन चालकाला भगदाडाचा अंदाज न आल्यास दुर्घटना होण्याची भीती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
पुढील चार दिवस पाऊस सतत कोसळल्यास पूल पूर्णपणे खचून मार्ग वाहतुकीस बंद होऊ शकतो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घेऊन दुर्घटना घडण्यापूर्वीच योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.