
सावंतवाडी : परभणी येथे भारतीय संविधानाची समाजकंटकाकडून झालेली विटंबना आणि त्यातून आंबेडकर अनुयायांचा घडलेला उद्रेक या घटनेचा निषेध करण्यासाठी आज सावंतवाडीतील आंबेडकर अनुयायानी शांततेत एकत्र येत या घटनेचा तीव्र निषेध केला. अशा विकृत प्रवृत्तींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असे आवाहन प्रांताधिकारी हेमंत निकम यांना दिलेल्या निवेदनात केले आहे.
मंगळवारी परभणी येथील आंबेडकर पुतळ्या नजीक असलेल्या कोरीव भारतीय संविधानाची एका समाजकंटकाने विटंबना केल्याने आंबेडकरी अनुयायीनी एकत्र येत बुधवारी मोर्चा काढला होता .या मोर्चाचे रूपांतर आंदोलनात होऊन मोठी जाळ पोळी झाले होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यातही उमटले होते. मात्र, सावंतवाडी सारख्या शांत शहरात अशा घटना घडू नये व शांतता अबाधित राहण्यासाठी आंबेडकरी अनुयायांसह भारतीय संविधान प्रेमींनी एकत्र येत या घटनेवर सविस्तर चर्चा करून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. अशा समाजकंटकाला कठोर शिक्षा करावी व अशा घटना पुन्हा पुन्हा राज्यात घडणार नाही याची दक्षता शासनाने घ्यावी असे आवाहन त्यांनी या निवेदनात केले आहे .या निवेदनावर सुमारे 100 संविधान प्रेमींच्या सह्या असून ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी हेमंत निकम यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी रवीजाधव ,वासुदेव जाधव, मिलिंद नेमळेकर ,लाडू जाधव ,ॲड सगुण जाधव ,भावना कदम ,मंगेश जाधव, के व्ही जाधव ,के जाधव सुरेश कारवडेकर इत्यादी आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.