सिंधुदुर्ग : सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचा सातबारा आदेश बांदेकरच्या माध्यमातून स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. त्यावर संजय राऊत यांनी प्रथम बोलावे. कोरोनाकाळात फक्त ठाकरे व पाटणकर कुटुंब यांच्यासाठी व्हीआयपी दर्शन सुरू ठेवून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावर गणपती पूजेसाठी सिद्धिविनायक मंदिरातील पुजारी ११ दिवस ठेवले होते. सिद्धिविनायक ट्रस्ट म्हणजे स्वतःची प्रॉपर्टी वाटली का ? अशा खरमरीत शब्दात भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी राऊत आणि उबाठा सेनेचा समाचार घेतला. कणकवली येथील निवासस्थानी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राम मंदिर कार्यक्रमाला बोलवलं नाही म्हणून थयथयाट करणे राऊत याने थांबवावे. संजय राऊत ज्या पद्धतीने प्रभू श्री राम यांच्याबद्दल अपशब्द उच्चारत आहे अशा पापी व्यक्तींना प्रभू श्री राम यांनीच प्रवेश नाकाराला आहे असे आमदार नितेश राणे म्हणाले. राम मंदिराच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. राणे म्हणाले, आमंत्रणावर आम्ही राजकारण केले नसल्याचे संजय राऊत म्हणाला. राऊतचा गजनी झाला आहे ? यापूर्वी मेट्रो, बाळासाहेब स्मारक भूमिपूजना अशा कार्यक्रमांना देवेंद्र फडणवीस यांना का डावलल ? मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी या कामांना गती दिली होती आणि मंजूर सुद्धा केली होती. कोणाला अयोध्येला बोलवाव हे प्रभू श्रीराम देवतेने ठरविले आहे. तुमच्या सारख्या पापी आणि जिहादी लोकांना बोलवलं नाही. राहुल गांधीचा पुन्हा एकदा फ्लॉप शो सुरू होतोय तिकडे तुम्ही जा. कारण, जेथे राहुल गांधींची यात्रा जाणार तेथे काँग्रेस पराभूत होणार आहे. त्यांच्या इंडीयाला सुद्धा यश मिळणार नाही. मणिपूर ते मुंबई भागात काँग्रेसचा पराभव निश्चित आहे. संजय राऊतचा घाम कुठे कुठे गळतो हे गोरेगाव रॉयल फार्मवरील कामगारांना विचाराव लागेल. उद्धव ठाकरेचा घाम कधी गळतो हा संशोधनाचा विषय आहे. ते नेहमी एसीमध्येच बसून असतात. खालच्या दर्जाची भाषा प्रभू श्री राम यांच्यासाठी संजय राऊत वापरत आहेत. आमच्या देवाला कोणीही किडण्याप करू शकत नाही. ५०० वर्षा पासून असलेली जनतेची इच्छा पूर्ण झाली आहे. हे याच्या सारख्या मुल्लाला कळणार नाही. दुसऱ्यांच्या उद्योग समूहावर बोलण्यापेक्षा पाटणकरबाबत संजय राऊतने एक अग्रलेख लिहावा अशी जहरी टिका नितेश राणे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहेत. राज ठाकरे हे सातत्याने सामाजिक विषय उचलत असतात. त्यामुळे मुख्यमंत्री आणि राज ठाकरे दोघांच्या भेटीने महाराष्ट्र राज्याच्या फायदा होईल. हे दोघेही नेते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यामुळे त्यांच्या भेटीतून राज्याला फायदाच होईल असा विश्वास यावेळी नितेश राणे यांनी व्यक्त केला. तर आमदार बच्चू कडू यांच्या बद्दल बोलताना आमदार राणे म्हणाले कोणी ही त्यांच्या सोबत चहा पिली, बिर्याणी दिली तरी ते महायुती सोबतच राहणार. दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय करणारे आमचे सरकार आहे हे त्यांना माहीत आहे.