सावंतवाडी : सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस व्हावे म्हणून उद्या २६ जानेवारी रोजी मळगाव रेल्वे स्थानकावर प्रवासी संघटनेच्या माध्यमातून उपोषण छेडले जात आहे. त्या आंदोलनाला उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पाठिंबा आहे अशी माहिती ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली.
सावंतवाडी मळगाव रेल्वे स्थानकावर टर्मिनस व्हावे आणि रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा आदी मागण्यांसाठी उपोषणाचा इशारा प्रवासी संघटनेच्या माध्यमातून दिवस आहे. त्याला उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पाठिंबा आहे सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन राऊळ यांनी केले.
गेली अनेक वर्ष सावंतवाडी टर्मिनस विषय भिजत घोंगड पडल आहे. तसेच गेल्या ८ वर्षांपूर्वी टर्मिनस भूमिपूजन झाले होते मात्र ते विकसित झाले नाही म्हणून प्रवासी जनतेत नाराजी आहे. या प्रश्र्नी काही नेते दिल्ली वारी करुन जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत आहेत असे रूपेश राऊळ यांनी सांगितले. ते म्हणाले, प्रवासी जनता रेल्वे गाड्या अभावी गैरसोयीचा प्रवास करत आहे. रेल्वे प्रश्नावर निवडणूक लढवणारे जनतेची दिशाभूल करत आहेत असे त्यांनी सांगितले. तर काही नेत्यांची दिल्ली सत्ता आहे, तर काहींचा वशिला आहे. त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला असता तर अशा आंदोलनाची वेळ आली नसती, परंतु दुर्दैव आहे.
प्रवासी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्याची वेळ येते. सावंतवाडी मळगाव रेल्वे स्थानकावर टर्मिनस व्हावे आणि सर्व गाड्यांना थांबा मिळावा तसेच प्रा. मधू दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यावे म्हणून खासदार विनायक राऊत यांनी देखील रेल्वेमंत्री, कोकण रेल्वे महामंडळ, महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे व करत आहेत असे त्यांनी सांगितले.