कुडाळ : गेली अनेक वर्षे मोफत शिष्यवृती परीक्षेसारखा उपक्रम शिक्षक भारती जिल्ह्यात राबवत आहे. शिक्षक भारती शैक्षणिक कामाबरोबर अनेक सामाजिक उपक्रमात सहभागी असते ही बाब कौतुकास्पद आहे.यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ही चांगली संधी प्राप्त करून देण्याचे काम शिक्षक भारती संघटना करत आहे. याबद्दल संघटनेला मी धन्यवाद देतो. असे गौरवोद्गार माजी जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब यांनी काढले.
आज रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गासाठी मोफत शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. 8 ते 12 या वेळेत जिल्ह्यातील विविध 27 केंद्रावर ही परीक्षा एकाच वेळी घेण्यात आली. या पाश्र्वभूमीवर एका परीक्षा केंद्रावर शुभारंभ प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर उपस्थित होते. जिल्ह्यातील 27 केंद्रावर 2500 विद्यार्थ्यी परीक्षेला प्रविष्ट झाले. जिल्ह्यातील सर्वात मोठी परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाबाबत पालक आणि शिक्षक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. येत्या चार दिवसांत जाहीर करण्यात येत आहे. यानंतर पाचवी - आठवी प्रत्येकी पहिले 25 यशवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.