आजारपणाला कंटाळून वृद्धाने जीवन संपवलं !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 19, 2024 06:36 AM
views 53  views

वैभववाडी : सततच्या आजारपणाला कंटाळून आचिर्णे तेलीवाडी येथील प्रकाश धाकू जाधव (वय ६१) या वृद्धाने तणनाशक पिऊन जीवन संपविले. त्यांचा  उपचारादरम्यान शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाला. या घटनेची खबर मयताचा मुलगा प्रमोद प्रकाश जाधव याने कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा तपास वैभववाडी पोलीस ठाण्याकडे आलेला आहे.

  आचिर्णे तेलीवाडी येथे प्रकाश धाकू जाधव हे पत्नीसोबत राहत हाते. त्यांचा मुलगा प्रमोद जाधव हा रोहा रायगड  येथे कामानिमित्त राहतो. शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास श्री.जाधव यांची पत्नी औषधे आणण्यासाठी लोरे येथे गेली होती. या कालावधीत श्री.जाधव घरी एकटेच होते. यांच्या हद्यावर काही दिवसांपुर्वी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर ते सतत डोकेदुखीने त्रस्त होते. त्यामुळे सततच्या आजारपणाला ते कंटाळले होते. यातुनच त्यांनी गोठ्यात असलेले तणनाशक प्राशन केले. त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला व ते बाथरूम मध्ये उलट्या करीत होते. दरम्यान त्यांची पत्नी घरी आली व उलट्या का करता असे विचारले असता  आपण तणनाशक प्राशन केल्याचे सांगितले. त्यानंतर नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी त्यांना तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.परंतु श्री.जाधव यांची प्रकृती अस्थिर असल्याने त्यांना कणकवली ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. तेथून त्यांना गोवा येथे नेण्यास सांगण्यात आले. मात्र मुलाने त्यांना तेथीलच खासगी रुग्णालयात दाखल केले.

उपचारा दरम्यान त्यांचा साडेआठ वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाला. दरम्यान मुलगा प्रमोद यांनी कणकवली पोलीसांत ही माहीती दिली. आता हा तपास पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रमिला शिंगाडे करीत आहे.