सावंतवाडी | भगवान शेलटे : फक्त दिखाव्यासाठी आपलं काम करणे वेगळ आणि कोणीही बघत नसताना प्रामाणिकपणे आपलं काम करण वेगळ. याचाचं प्रत्यय आला सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या कामातून. सरकारचं महाऑनलाईन पोर्टल गेले दोन दिवस संथ गतीने चालत होत. यामुळे अनेकांचं दाखल्यांचं काम रखडले होते. सध्या विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा कालावधी आहे. त्याचबरोबर नोकरीसाठीही अनेक दाखले लागतात. यामुळे विद्यार्थ्यांची आणि नोकरीसाठी जात असलेल्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी रात्रभर स्वतः जागून महत्वाच्या दाखल्यांचं काम पूर्ण केलं. तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या सारख्या अधिकाऱ्यांचं हे दुर्मिळ उदाहरणच म्हणावं लागेल.
तहसीलदार पाटील यांनी रात्रभर जागून मिळकतीचे प्रमाणपत्र, रहिवास, वय राष्ट्रीय अधिवास, अल्पभूधारक, नॉन क्रिमीलेअर , शेतकरी असे जवळपास १२६ दाखले पूर्ण केले. यामुळे अनेकांची रखडलेली कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. विशेषतः नोकरीसाठी लागणारे दाखले पूर्ण झाल्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केलं. आणि पाटील यांच्या कामाच कौतुकही केलं.
काही अधिकारी प्रशासकीय सेवेमध्ये रुजू होतात, त्यामध्ये फक्त करिअरचाच मुख्य उद्देश असतो असे नाही. त्या माध्यमातून जनसामान्यांची सेवा करता येते, त्यांचे प्रश्न सोडवता येतात, खऱ्या अर्थाने न्याय देता येतो आणि त्यातून लोकसेवा करता येऊ शकते. हे ध्येय उराशी बाळगून प्रशासकीय सेवेत येतात. जनतेशी एकरूप होतात. श्रीधर पाटील हे असेच एक अधिकारी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतय. सावंतवाडी तहसीलदार म्हणून कार्यरत असणाऱ्या पाटील यांच्याकडे चित्र बदलवण्याची ताकद त्यांच्याकडे असल्याच दिसून येतंय.