पारंपरिक मच्छिमारांना अनुदान द्यावे

धी मुठ मच्छीमार सहकारी संस्थेच्यावतीने मागणी
Edited by: दिपेश परब
Published on: September 18, 2024 14:48 PM
views 75  views

वेंगुर्ला : समुद्रात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांमध्ये छोटे व थव्याने मिळणारे विविध प्रकारचे मासे पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना तारत असतात. परंतू यंदा पावसाच्या तुफानी वाऱ्याची स्थिती असल्याने मस्त्य हंगाम पूर्ण नष्ट झालेला आहे.  सतत होणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे पारंपारीक मच्छीमार मासेमारी करु शकले नाही. ऐन हंगामाच्या वेळी मासेमारी पूर्ण क्षमतेने झालेली नसल्याने मासेमारीस मुकावे लागलेले आहे. यामुळे उभादांडा येथे मत्स्यदुष्काळजन्य स्थिती लक्षात घेऊन त्याअनुषंगाने पारंपरिक मच्छिमारांना अनुदान देण्यात यावे. अशी मागणी "धी" मुठ मच्छीमार सहकारी संस्था यांच्या वतीने वेंगुर्ला तहसीलदार व मत्स्य परवाना अधिकारी, मत्स्य विभाग वेंगुर्ला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

     या निवेदनात असे म्हटले आहे की, आम्ही उभादांडा येथे राहणारे मच्छीमार हे पारंपारीक मच्छिमार आहोत. सततच्या वातावरणातील बदलांमुळे व वादळी वाऱ्यांमुळे किनाऱ्यालगत मासे न आल्याने माहे ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यांमध्ये मिळणाऱ्या मासेमारीच्या तुलनेत यावर्षी केवळ ५% मासेमारी झालेली आहे. आजची सरासरी पाहता असता गेली तीन वर्षे आम्ही पारंपारिक मच्छीमार पुर्णपणे मेटाकुटीला आलेलो आहोत. पूर्वी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत जास्त क्षमतेने १००% मासेमारी व्हायची परंतू गेली तीन वर्षे तसेच चालु वर्षी देखील या महिन्यांमध्ये पारंपारिक मासेमारी ही ५% क्षमतेने झालेली आहे.  त्यामुळे आम्हा मच्छीमारांना फार मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटास सामोरे जावे लागलेले असून आम्हांवर उपासमारीची वेळ देखील उद्भवणारी आहे.  परिणामी आम्हाला कुटुंबासहित आत्महत्येशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही. 

     मस्त्य व्यवसायाचा सुरुवातीचा काळ हा पारंपारिक पध्दतीने मासेमारी करण्याचा महत्वाचा काळ असतो. कारण काहीशा वादळी हवामानामुळे मोठ्या (हाय स्पीड / एलईडी) ट्रॉर्ल्सची मासेमारी पूर्ण क्षमतेने सुरु नसते. त्यामुळे आमच्या सारख्या पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना मासेमारी करण्यास चांगली मोकळीक मिळते. परंतू गेली तीन वर्षाच्या व यंदाच्या मत्स्य हंगामाच्या सुरुवातीपासून वादळी हवामानामुळे आम्हां मच्छिमारांचे मासेमारीचे दिवस आणि तास खूपच घटले आहेत.  त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला, देवगड, मालवण येथील शेकडो मच्छीमार बांधव समुद्रात मासे नसल्याने मच्छिमारी होत नाही या कारणाने चिंताग्रस्त झालेले आहेत.

      देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर १ ऑगस्टपासून यांत्रिकी मासेमारीस प्रारंभ झालेला आहे. आम्हांला दिलेल्या माहितीनुसार मत्स्य हंगामाच्या सुरुवातीपासूनच मत्स्य विभागाकडून आम्हांला समुद्रातील खराब हवामानाबाबत खबरदारीच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच पत्रांद्वारे पत्रव्यवहार करुन खराब हवामानामुळे मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीकरीता जाऊ नये असे आवाहन देखील केलेले होते. याच वादळी हवामान संदेश पत्रांच्या आधारावर शासनाने कोकणातील मच्छीमारांना पूर्ण क्षमतेने मच्छीमारी करता न आल्याने याच शीर्षकाखाली सानुग्रह अनुदान मंजूर करावे व आम्हां मच्छिमारांना सहकार्य करावे जेणेकरुन येणाऱ्या संकटास सामोरे जाण्यास आम्हांला बळ येईल. असे या निवेदनात म्हटले आहे. 

    यावेळी मच्छिमार नेते संजय गावडे, वाल्मिक कुबल, संस्था चेअरमन शामसुंदर रेवणकर, सभासद युवराज गिरप, भानुदास आरावंदेकर, करण तांडेल, तेजस बांदेकर आदी उपस्थित होते.