SPK त 'संस्थापक दिन' उत्साहात

डॉ. माणिकराव साळुंखेंचं AI वर मार्गदर्शन
Edited by: विनायक गांवस
Published on: August 13, 2025 14:47 PM
views 22  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक  मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे 13 ऑगस्ट 2025 रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लेफ्टनंट कर्नल, हीज हायनेस राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांची 98 वी जयंती 'संस्थापक दिन' म्हणून साजरी करण्यात आली. 

या समारंभाचे अध्यक्षस्थान  संस्थेचे विद्यमान अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांनी भूषविले. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे हे उपस्थित होते. याप्रसंगी राजेसाहेब शिवरामराजे भोंसले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेच्या चेअरमन सौ शुभदादेवी खेमसावंत भोंसले, संस्थेचे संचालक प्रा. डी टी देसाई, सहाय्यक संचालक अॅड. शामराव सावंत, संस्थेच्या नियमक मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत व डॉ. सतीश सावंत, कमल साळुंखे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल, संस्थानप्रेमी  नागरीक ,सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर, अॅड.नकुल पार्सेकर, प्रा अन्वर खान,मंगेश तळवणेकर ,अॅड. संदीप निंबाळकर, यशवंत देसाई, भरत नार्वेकर,लॉ कॉलेजच्या प्राचार्या अश्विनी वेंगुर्लेकर, मदर क्विन्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर, संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ स्मिता सुरवसे, रमा सावंत महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख अतिथी माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी 'कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील संधी'  या विषयावर   मार्गदर्शन केले. त्यावेळी ते असे म्हणाले की, श्रीमंत  शिवरामराजे भोंसले हे अतिशय बुद्धिमान ,अनेक कलांमध्ये पारंगत असलेले बहुआयामी व्यक्तिमत्व होते. सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्यासोबतच त्यांनी गंजिफा सारख्या कलेला उर्जितावस्था प्राप्त करून दिली. त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे .

कृत्रिम बुद्धिमत्ता ही भविष्यामध्ये माणसासाठी वरदान ठरणारी आहे ,परंतु यामुळे अनेक नोकऱ्या जाण्याचाही धोका संभवू शकतो. टीसीएस सारख्या कंपनीने आपले बारा हजार कर्मचारी कमी केले हे त्याचेच उदाहरण आहे. मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता ही माणसाला पर्याय ठरू शकत नाही कारण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने इंटरनेटवर असलेला डेटा याचे एनालिसिस करून त्याप्रमाणे माहिती देण्याचं काम ती करत असली तरी मानवी भावभावना, प्रज्ञा, आदर्श ,संस्कार यांची जागा ते घेऊ शकत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता नवनिर्मिती करू शकत नाही. त्यासाठी प्रज्ञावंत माणसांचीच गरज आहे.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांनी केले. त्यांनी महाविद्यालयाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला व  कृत्रिम बुद्धिमत्ता व डेटा सायन्स हे विषय महाविद्यालयामध्ये शिकवले जात आहेत याबद्दल माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले हे अध्यक्षीय भाषणामध्ये असे म्हणाले की, आमच्या राजघराण्याने सदैव जनतेचा सर्वांगीण विकास हे लक्ष ठेवून या भागामध्ये सुधारणा केल्या, त्याचाच परिणाम असा आहे की या क्षेत्रामध्ये विविध रोजगार व प्रगती दिसत आहे. शिक्षकांनी आपले ज्ञान अद्यावत ठेवावे व विद्यार्थ्यांना नेहमी आजच्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी चांगले मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यानीही बदलते तंत्रज्ञान आत्मसात करून प्रगती करावी असा आशावाद त्यांनी व्यक्त  केला.

याप्रसंगी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शारीरिक कमतरतेवर मात करीत बीकॉम परीक्षेमध्ये प्राविण्य मिळविलेल्या कु.चैताली प्रसाद तेंडुलकर, तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी  शाहीन रिजवान करोल हिने जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. तसेच 2024-25  मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या सीनियर नॅशनल कॅरम चॅम्पियन स्पर्धेमध्ये टी वाय बी कॉम ची विद्यार्थिनी केशर राजन निर्गुण हिने द्वितीय क्रमांक पटकावला. या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे माजी कर्मचारी मोरेश्वर पोतनीस यांनी राजेसाहेब शिवरामराजे भोंसले यांच्या जीवनावरील भावनिक काव्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूगोल विभागाच्या प्राध्यापिका सौ पूनम सावंत यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. यू सी पाटील यांनी तर आभार वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ यु आर पवार यांनी मानले.