रत्नागिरी : भारत - चीन सीमेवर रस्ता बनविण्यासाठी जागेची रेकि करण्यासाठी मोरवणे गावचे सुपुत्र व माजी सैनिकी मुलांचे वसतीगृह चिपळूणचे छात्र सुभेदार अजय शांताराम ढगळे हे गेले असता सततच्या पावसामुळे, बर्फवृष्टीमुळे सिक्कीममधे झालेल्या मोठ्या प्रमाणात भूस्खलनात मातीच्या व बर्फाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. सुभेदार अजय ढगळे व त्यांच्याबरोबर असलेले चार जवान सुद्धा होते.
याची माहिती मिळताच भारतीय सेना दल यांनी सहा दिवस त्यांना शोधले आणि अथक प्रयत्न करून भारतीय सेनेच्या सैनिकांनी भल्या मोठ्या चिखल दगड बर्फाच्या खाली असलेल्या बहादुर शहीद सुभेदार अजय ढगळे व इतर चार जवानांना शोधून काढले. शहीद अजय ढगळे हे कारगील लढाईमध्ये टायगर हिल जिंकणाऱ्या जांबाज बहादुर टीमचा सुद्धा हिस्सा होते. त्यांचा पार्थिव देह सोमवारी मोरवणे गावी आणण्यात येणार आहे
अजय ढगळे यांचे पार्थिव शनिवारी संध्याकाळी तवंगला आणतील. हवामान खराब असल्यामुळे रस्ता मार्गने रविवारी संध्याकाळी गुवाहाटीला आणतील. त्यानंतर गुवाहाटीवरून सोमवारी विमानाने पुणे येथे पार्थिव येईल. त्यानंतर पुणे येथून रस्तामार्गे मोरवणे (धगळेवाडी) चिपळूणला आणले जाईल आणि सोमवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. मोरवणे येथे त्यांच्या गावी त्यांचे आई-वडील असतात व त्यांची पत्नी, मुले हे कुटुंब बोरिवली येथे वास्तव्यास आहे.