सावंतवाडी : येथील स्थानकाहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या ‘मांडवी एक्सप्रेस’मधील प्रवाशांनी आज सकाळी अक्षरशः ‘द बर्निंग ट्रेन’चा थरार अनुभवला. या रेल्वेच्या पाठीमागच्या एका डब्याखालून धूर आल्याने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. सावंतवाडी स्थानकाच्या मागे अर्ध्या किलोमीटरवर हा प्रकार घडल्यानंतर लगेच रेल्वे थांबवण्यात आली. त्यानंतर कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी यावर नियंत्रण मिळवले. ब्रेकमधील तांत्रिक दोषामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाच उपस्थित कर्मचार्यांनी व्यक्त केला आहे.
मडगाव येथून मुंबईच्या दिशेने आज सकाळी निघालेली ‘मांडवी एक्सप्रेस’ मडुरे स्थानकावर पोहोचली. तोपर्यंत सर्वकाही ठिक होते. मात्र, या स्थानकावरून सावंतवाडीच्या दिशेने निघाल्यानंतर खळबळजनक घटना घडली. सावंतवाडी स्थानक अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असताना जनरेटर कार, दीव्यांग व गार्डसाठीच्या शेवटच्या डब्याच्या खालून धूर येऊ लागला. यामुळे सावंतवाडी स्थानकावर कशीबशी गाडी आणून थांबवण्यात आली. या डब्यातील रेल्वे कर्मचार्यांनी स्थानकावरील अधिकार्यांना याबाबत माहिती दिली. डब्यातील महिला प्रवाशांनी घाबरून प्लॅटफॉर्मवर धाव घेतली. त्यानंतर अग्निशमनासाठी वापरण्यात येणार्या बॉटल्स वापरून यावर नियंत्रण आणण्यात आले.
उपस्थित कर्मचार्यांनाही याचे नेमके कारण समजलेले नाही. मात्र, रेल्वेच्या डब्याला असलेल्या डिस्क ब्रेकमधील पॅड जळाल्याचा वास आल्याने ब्रेकमधील काही तांत्रिक कारणांमुळे ही घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.