भाजपचं 'गाव चलो अभियान' !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 24, 2024 13:21 PM
views 166  views

कुडाळ : भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या आदेशाने ४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने गाव चलो अभियान राबविले जाणार आहे. यासाठी रणजित देसाई यांची संयोजक तर मनोज राव राणे व संजू परब यांची सह संयोजक म्हणून नेमणूक करण्यात आले असल्याची घोषणा आज जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली तर याबाबतची पत्रकार परिषद घेत जिल्ह्यातील ९१७ बुथवर गाव चलो अभियान राबविण्यात येणार असल्याचे यावेळी  देसाई यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रणजीत देसाई, मनोज रावराणे, संजू परब, दीपक नारकर संजय वेंगुर्लेकर, रुपेश कानडे, संदेश नाईक, पप्या तवटे, निलेश परब, बंड्या सावंत, अक्षय दळवी आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना गाव चलो अभियानाचे संयोजक रणजीत देसाई यांनी सांगितले की,२०१४ ते २०२४ या दहा वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने देशातील सर्व क्षेत्रात प्रचंड गतीने विकास केला आहे. गरीब कल्याण, महिला सशक्तिकरण, देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा अशा अनेक क्षेत्रात मोदी सरकारने मोठी कामगिरी करत आंतरराष्ट्रीय पातळीवर ही देशाचे नाव उंचावले आहे.


दोनच दिवसांपूर्वी अयोध्या मधील श्रीराम मंदिर व प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना अत्यंत आनंदी, उत्साही व भक्तीमय वातावरणात पार पडली. या निमित्ताने संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा केला गेला. गेल्याच महिन्यात संपूर्ण भारतात विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात ज्या योजना समाजातील सर्वच घटकांसाठी राबवल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा या यात्रेला लाभार्थी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे . या यात्रेच्या यशस्वीतेनंतर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या सूचनेनुसार दिनांक ४ ते ११ फेब्रुवारी या काळात संपूर्ण देशातील सात लाख खेड्यांमध्ये व शहरांमध्ये गाव चलो अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हे अभियान जिल्ह्यातील ९१७ बुथवर राबविण्यात येणार आहे.या अभियानामध्ये प्रत्येक बुथवर एक निवासी कार्यकर्ता भेट देऊन त्या ठिकाणी एक दिवस पूर्ण वेळ राहणार आहे. 


सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यशाळा दिनांक २७ जानेवारी रोजी ओरोस येथील पक्षाच्या जिल्हा कार्यालयात दुपारी ३.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. असेही यावेळी रणजित देसाई यांनी सांगितले. तर यापुढे बोलताना रणजित देसाई यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी लक्षात घेता जिल्ह्यातील प्रत्येक बुथवर भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष यांना एकत्रितरित्या ५१ टक्के पेक्षा अधिक मते मिळविण्याकरता या अभियानाच्या माध्यमातून आखणी करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक रचना बूथ स्तरापर्यंत १ प्लस ३० अशी पूर्ण आहेच,यापुढे मतदार यादीच्या प्रत्येक पानासाठी एक पन्ना प्रमुख नियुक्त करण्यासाठी बैठका सुरू आहेत.या सगळ्याचा उपयोग भारतीय जनता पार्टीला प्रत्येक बुथवर ५१% मतदान मिळण्यासाठी होणार असून,पंचायत से पार्लमेंट पर्यंतच्या सर्व निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी अव्वल ठरणार आहे.

या अभियाना दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे, ,पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच केंद्र व राज्यस्तरावरचे अनेक नेते जिल्ह्यात प्रवास करणार आहेत. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक पदाधिकाऱ्यावर एक बूथ ची जबाबदारी देण्यात आलेली आहे. या अभियाना अन्तर्गत प्रत्येक बुथची जबाबदारी एका प्रवासी कार्यकर्त्यावर देण्यात येणार आहे. 


जनसंघापासून काम करणाऱ्या तसेच भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची भेट घेणे

गावातील युवक, शेतकरी तसेच व्यावसायिक यांच्या समूह बैठका घेणे,क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंची भेट घेणे, शाळेत जाऊन शिक्षक व विद्यार्थी यांच्याबरोबर संवाद साधणे,गावातील सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींची भेट घेणे, स्वयंसेवी संस्था तसेच बचत गटाच्या प्रतिनिधींची भेट घेणे, सर्वधर्मीय धार्मिक स्थळांना भेट देणे,अनुसूचित जाती-जमातीच्या वस्त्यांना भेट देणे 

लाभार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत छायाचित्र काढणे 

जिल्हा परिषद पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींची भेट घेणे, सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणे,युद्धामध्ये, अतिरेकी व नक्षलवादी हिंसाचारात ठार झालेल्या जवानांच्या व पोलिसांच्या कुटुंबीयांची भेट घेणे,अंगणवाडी, आशा सेविका, पोस्टमन, तलाठी यासारख्या स्थानिक कर्मचाऱ्यांची भेट घेणे,स्वच्छता, पर्यावरण रक्षण अमृत सरोवरांची सफाई करणे आणि खेळांमध्ये व अन्य उपक्रमांमध्ये सहभागी होणे. यासारखे उपक्रम राबवले जाणार आहेत. तर  गाव चलो अभियानाची दि ११ फेब्रुवारी रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिदिनी या अभियानाची सांगता होणार आहे. गाव चलो अभियानामुळे समाजातील सर्व घटक हे भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांशी जोडले जावे याकरता देखील प्रयत्न करण्यात येणार आहेत.