सावंतवाडीच्या व्यथा मुख्याधिकारी ना कानावर घेत, ना मनावर : रवी जाधव

Edited by:
Published on: December 13, 2024 19:50 PM
views 225  views

सावंतवाडी : नगरपालिकेवर प्रशासक बसल्यानंतर विकास काम अजून ठप्प होऊन मनमानी कारभाराला सुरुवात झाली. येथील नागरिकांना महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी सुद्धा आठ आठ दिवस वाट पाहावी लागते. तर शहरातील नुकतेच बनवलेले  रस्ते अवघ्या दोन महिन्यातच वाहून गेलेत. शहरातील काही रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. सावंतवाडीच्या व्यथा मुख्याधिकारी ना कानावर घेत, ना मनावर अशी खंत सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, याची नेमकी कारणे कोणती हे शहरवासीयां वेगळ सांगायला नको. येथील जनता जागृत आहे शहरातील स्वच्छतेचा गंभीर आहे. मच्छर भगाव यंत्रणेचा दिखावा, शहरात ठिकठिकाणी कचरा,पिण्याच्या पाण्याच्या समस्या व प्रत्येक वार्डातील कचरा रस्ता व लाईटच्या समस्या त्याचप्रमाणे सावंतवाडी मोती तलावामध्ये निर्माण होत असलेला हिरवा तेलकट तवंग, त्यामध्ये कचऱ्याच साम्राज्य त्यामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे मोती तलावाला गटाराचे स्वरूप निर्माण झाले आहे. तलावाच्या काठावर संध्याकाळच्या वेळी बसणारी ज्येष्ठनागरिक मंडळी त्याचप्रमाणे बाहेरून येणारे पर्यटक यांच्यामध्ये सुद्धा नाराजीचे स्वर निर्माण झालेले आहेत. अशा या परिस्थितीत सुसंस्कृत व पर्यटनाकडे वाटचाल करणाऱ्या सावंतवाडी शहराला वाली कोण ? हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. हे प्रश्न निर्माण होत असताना मुख्याधिकाऱ्यांच नेमका लक्ष कुठे आहे. कित्येक लोकांच्या तक्रारी आहेत. मुख्याधिकाऱ्यांकडे एखादी समस्या घेऊन गेल्यावर त्यांच म्हणणं ऐकून न घेता उत्तरे दिली जातात अशा या अधिकाऱ्यांना विचारणार कोणी नसल्याकारणाने मनमानी कारभार सुरू आहे.

प्रत्येक अधिकारी किंवा कर्मचारी हे जनतेचे सेवक आहेत. जनतेच्या सेवेचा त्यांना मानधन दिल जात. परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीं या स्वतःचा वेळ व पैसा खर्च करून नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून रस्त्यावर उतरून खड्डे बुजवण्याचे काम, रस्त्यावर पडलेली झाडे हटवणे स्वच्छता अभियान राबवणे तर कित्येकवेळा पालिका क्षेत्रात अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेऊन त्यांचा जीव वाचवणे अशा प्रकारची कामे करतात. परंतु या गोष्टीची या अधिकाऱ्यांकडून दखल घेणे सोडाच उलट या कामाचा त्यांना कमीपणा वाटतो. त्यामुळे ते सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना दुय्यम वागणूक देतात. याचाही अनुभव सामाजिक क्षेत्रातील लोकांनी घेतला आहे. शहरामध्ये सांस्कृतिक उपक्रम राबवायचे झाले तर मुख्याधिकारी सहकार्य करत नाही याचाही अनुभव काहींनी घेतलेला आहे. सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच हे वागणं शहरातील जनतेच्या सोयी सुविधांसाठी मारक आहे अशी खंत रवी जाधव यांनी व्यक्त केली आहे.