
सावंतवाडी : निरवडे गावात भरवस्तीत डुक्कर व्यवसाय केला जात असून याचा येथील ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. व्यायसाय कुणीही करावा पण इतरांना त्रास होता कामा नये याचीही दक्षता घ्यायला हवी. ग्रामस्थांनी गेले ६ महिने आरोग्य विभागाकडे तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली गेली नाही. आज हे ग्रामस्थ आमच्याकडे न्याय मागण्यासाठी आलेत. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांच्या कानावर हा विषय घालून संबंधितांना न्याय मिळवून देणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सांगितले.
परब म्हणाले, रोशन धारगळकर यांनी डुक्कर व्यवसाय करावा. मात्र, आजूबाजूच्या लोकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. विष्ठेचा वास सहन होणारा नसून भर वस्तीत हा प्रोजेक्ट आहे. गेले ६ ते ७ महिने आरोग्य विभागाकडे तक्रार करूनही कोणतीही दाद मिळत नाही. न्याय मागण्यासाठी निरवडेतील ही लोकं आमच्याकडे आली असून हा विषय पालकमंत्री नितेश राणे यांच्या कानावर घालणार आहे. ते निश्चितच जनतेला न्याय देतील. त्यांना याबाबत निवेदन आम्ही देणार असून ६ महिने अधिकारी करतात काय ? असाही सवाल श्री. परब यांनी केला. तक्रार करून ते दखलही घेत नसतील तर पालकमंत्र्यांच्या रोषाला अधिकाऱ्यांना बळी पडावं लागेल असाही इशारा त्यांनी दिला. यावेळी राजू धुमाळ, विलास नाईक, प्रतीक्षा पारकर, रोहन धुमाळ, वासुदेव गावडे, सर्वेश जाधव, चंद्रशेखर पेडणेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.










