राष्ट्रवादीला भाजपा - शिवसेनेकडून चर्चेत डावललं

१४ पर्यंत वाट पाहू अन्यथा उमेदवार उभे करू | राष्ट्रवादीचा इशारा
Edited by: विनायक गांवस
Published on: November 11, 2025 18:30 PM
views 88  views

सावंतवाडी : नगरपरिषद निवडणुकीसाठी महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला भाजपा आणि शिवसेनेकडून चर्चेला सुद्धा बोलावले नाही. त्यामुळे येणाऱ्या १४ तारीख पर्यंत आम्ही यासाठी वाट पाहू. अन्यथा, नगराध्यक्ष पदासह २० ही जागेवर आम्ही आमचे उमेदवार उभे करण्याची तयारी ठेवली आहे, अशी माहीती तालुकाध्यक्ष उदय भोसले यांनी दिली. राष्ट्रवादीला कमी लेखाल तर अडचणीत याल आणि बरोबर घेतला तर यश मिळवाल असा सूचक इशाराही भोसले यांनी देत उल्का उमाकांत वारंग या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या संभाव्य उमेदवार असल्याचे जाहीर केले.

भोसले यांनी आज येथील राष्ट्रवादी (अजित पवार गट) संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष उमाकांत वारंग, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस सुरेश गवस जिल्हा उपाध्यक्ष एम.डी सावंत, प्रदेश महासचिव शफिक खान, अनंतराज पाटकर महिला तालुकाध्यक्ष सिद्धी परब शहर अध्यक्ष ऑगस्तिन फर्नांडिस, महिला जिल्हा उपाध्यक्ष रंजना निर्मल,मानसी देसाई, गुरुनाथ कामत आधी उपस्थित होते.

भोसले म्हणाले, महायुतीसाठी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांकडून शिवसेना आणि भाजप यांच्यासोबत समन्वय सुरू आहे. परंतु, या ठिकाणी स्थानिक पातळीवर अद्यापही आम्हाला कोणालाही चर्चेसाठी बोलावण्यात आलेले नाही. आमची महायुती व्हावी अशी मनीषा आहे. त्यासाठी आम्ही आमचे दरवाजे खुले ठेवले आहे. परंतु, आम्हाला कोणीही कमी लेखू नये. उद्या मतदानानंतर निकालावेळी उमेदवार पराभूत झाल्यास त्याला भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष जबाबदार राहतील. येणाऱ्या 14 नोव्हेंबर पर्यंत आम्ही महायुतीसाठी वाट पाहणार आहोत. समोरून कोणीही बोलावले नाही तर आम्ही एकला चलोची भूमिका घेणार आहोत. सद्यस्थितीत अशा प्रकारची तयारी आम्ही ठेवली असून नगराध्यक्ष पदाची संभाव्य उमेदवार म्हणून आम्ही उल्का उमाकांत वारंग यांना निवडले आहे. विसही जागेवर जनतेमधील उमेदवार निश्चित केले आहे. आमचे उमेदवार हे सुशिक्षित तसेच लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणाऱ्या पैकी आहे. त्यामुळे आम्हाला निश्चितच निवडणुकीमध्ये यश मिळणार आहे. तसेच आमचा पक्ष हा सेक्युलर भूमिकेचा आहे. त्यामुळे जनता आमच्या बाजूने राहणार हे सुद्धा निश्चित आहे त्यामुळे कमी निकाल तर अडचणीत याल सोबत घ्याल तर यश मिळवाल असंही ते म्हणाले.