जिल्हा बँक प्रकरणात सेटलमेंट..?

रुपेश राऊळांचा तेलींवर नेम | मनिष दळवींच्या चौकशीच काय झालं..? | राऊळांनी तेलींना चॅलेंज दिलं
Edited by: विनायक गांवस
Published on: October 17, 2025 14:25 PM
views 691  views

सावंतवाडी : जिल्हा बँक व अध्यक्ष मनिष दळवींवर राजन तेली यांनी टीका करत चौकशीची मागणी केली. त्या चौकशीच काय झालं ? याच उत्तर तेली त्यांनी द्यावं, जनतेला उत्तर हव आहे. जिल्हा बँकेवर केलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप करणारे तेली पुरावे कधी समोर आणणार ? असा सवाल उबाठा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केला. जिल्हा बँक प्रकरणात तेलींनी सेटलमेंट केली का ? जनतेचा पैसा तिथे आहे‌‌, जनतेशी बांधिलकी जपा. भ्रष्टाचार झाल्यास तो पुढे आणा, तुमच्यात धमक नसेल तर मला पुरावे द्या, मी उतरतो रसत्यावर असाही इशारा त्यांनी दिला. 

सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत श्री. राऊळ बोलत होते‌. यावेळी शहरप्रमुख शैलेश गवंडळकर, विनोद ठाकूर,  समिरा खलील, बाळु माळकर आदी उपस्थित होते‌‌. ते पुढे म्हणाले, आमदारकीसाठी म्हणून आमच्याकडे आलेले राजन तेली शिंदे गटात जाऊन आमच्या संघटना बांधणीवर बोलत आहे. ज्यांनी आमदारकीसाठी चार पक्ष बदलले त्यांना बोलायचा नैतिक अधिकार नाही. काम सरो वैद्य मरो असं त्यांचे कार्य आहे. त्यांनी गेल्या घरी सुखी रहाव, असा टोला हाणला. 

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निलेश राणे, दीपक केसरकर यांच्या सहकार्याने बँकेतील भ्रष्टाचाराची कधी चौकशी लावणार ? याच उत्तर पहिल्यांदा द्यावं. जनतेचे दिशाभूल करू नये, पुन्हा २०२९ ला आमच्याकडे येतील म्हणून बोललो नव्हतो. पण, आमच्या पक्षावर टीका केली तर खपवून घेणार नाही असा इशारा श्री. राऊळ यांनी दिला. केसरकरांच्या खांद्याला खांदा लावून तेलींनी आता काम कराव असा टोला हाणला. पाच पक्ष बदलणाऱ्या तेलींवर नेहमीच अन्याय का होतो ? आमच्यावर अन्याय झाला म्हणून आम्ही पक्ष सोडत नाही‌. आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत असं त्यांनी स्पष्ट केले.  

दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब प्रवेश घेतात आणि कार्यकर्ते दुसऱ्या दिवशी भाजपात जातात. ते भाजपचे कार्यकर्ते घेऊन उबाठा शिवसेनेचे असल्याचे दाखवत आहेत. भाजपचे कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे असल्याचे दाखवले जात आहे. कारिवडेत आमचे ठराविक कार्यकर्ते गेलेत. पण, बरेचजण हे महेश सारंग समर्थक होते असंही त्या स्पष्ट केले. त्यांच काम असंच सुरू राहू देत असंही विधान केलं.  महाविकास आघाडी म्हणून आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ. पण, आमची स्वबळाचीही तयारी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्याबाबतीत योग्य निर्णय घेऊ, असे श्री‌. राऊळ यांनी स्पष्ट केले. तर तालुकाप्रमुख मायकल डिसोझा हे प्रामाणिक कार्यकर्ते आहे. हिंमत असेल तर त्यांना फोडून दाखवावं असं आव्हानही दिले.