
सावंतवाडी : सध्या सावंतवाडी तालुक्यात मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानातर्गत अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. मात्र, ऑक्टोंबर 2023 पासून सावंतवाडी तालुक्यातील १९० लाभार्थी यांनी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय बांधली त्यांचे अनुदान गेले दोन वर्षे झाली मिळालेले नाही. ग्रामसेवक, गटविकास अधिकारी व इतर पंचायत समिती अधिकारी लोकांची कामे वेळेवर करत नाहीत. त्यामुळे त्यांना प्रशिक्षण देऊन काय उपयोग ? असे प्रशिक्षण अभियान घेण्यापेक्षा लोकांचे अनुदान जमा करा, अशी टीका सामाजिक कार्यकर्ते गुरुदास गवंडे यांनी केली आहे.
ग्रामपंचायतिकडून लोकांना वारंवार शौचालय बांधण्यास सांगितले जाते. तुम्हाला निधी मिळणार असे सांगितले जाते. परंतु, राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून कुठचेही पाऊल उचलले गेले नाही. त्यामुळे शाश्वत विकासासाठी जागतिक परिवर्तन कार्यक्रम व मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज प्रशिक्षण घेऊन काय उपयोग आहे. आजपर्यंत किती प्रशिक्षण घेतली आणि किती जणांना याचा लाभ झाला हे जाहीर करावे. गावागावात कचरा वाहनकरीता तीन चाकी सायकल, रिक्षा दिल्यात त्या सडत आहेत. त्याचा देखभाल दुरुस्ती करायला ग्रामपंचायतीकडे निधी नाही. गावागावातील लोक ग्रामपंचायतीकडे जातात तेव्हा ग्रामपंचायत प्रशासन त्यांना सांगते की, पंचायत समितीमध्ये जाऊन चौकशी करा पैसे मिळणार, म्हणून लोक उंबरे झिजवतात.
त्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार आणि आता मळगाव येथील लाल लुचपतच्या जाळ्यात अडकलेले ग्रामपंचायत अधिकारी त्यामुळे येथे कोणाचाही वचक नाही. सावंतवाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी पद रिक्त आहे. जिल्हा प्रशासनाचा वचक राहिला नाही. आज जिल्हा परिषद मुख्य अधिकारी खेबुडकर यांनी ग्रामसेवकांची हजेरी लावण्याकरता एक ॲप तयार केलेला आहे. परंतु तो ॲप कामच करत नाही. त्यामुळे कोणी कधी यायचं कधी जायचं हे आज सावंतवाडी तालुक्यात चाललेले आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने आज घरपत्रक उतारा देण्याकरता ४० हजाराची लाच घेताना एक अधिकारी पकडला जातो तसेच या जिल्ह्यात एक मोठ रॅकेट आहे. त्यामुळे झारीतील शुक्राचार्य कोण ? हे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी शोधावे असा सल्लाही गुरुदास गवंडे यांनी दिला आहे.










