
सावंतवाडी : महाराष्ट्र नॅचरल गॅस आणि नळपाणी योजनेच्या ठेकेदाराकडून शहरात खणून अर्धवट स्थितीत खडीकरण करून ठेवलेल्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. आज रात्रीच्या सुमारास येथील आयटीआय समोर खड्डयातील पाण्याचा अंदाज न आल्याने एक दुचाकीस्वार महिलेचा अपघात झाला. या अपघाता तीला गंभीर दुखापत झाली असून संबंधित ठेकेदारांवर, सीओंवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
शहरात सर्वत्र गॅस कंपनी आणि नळपाणी योजनेच्या ठेकेदाराकडून खणलेत. खडीकरण करून डांबरीकरण न केल्याने पावसात याचे रूपांतर खड्ड्यात झाले असून आयटीआय ते वनविभाग, मिलाग्रीस हायस्कूल ते रेस्ट हाऊससह शहरातील अनेक भागात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज रात्री लक्ष्मी विष्णू कॉम्प्लेक्स समोरील भागात पावसाचे पाणी साचलेल्या खड्डयाचा अंदाज न आल्याने एक दुचाकीस्वार महिलेला अपघात झाला. तोल जाऊन ती खाली पडली. मुख्य रस्ता असल्याने मागाहून गाड्यांची रहदारी नसल्याने सुदैवाने तीचा जीव वाचला. मात्र, हे गंभीर प्रकार बघता संबंधित ठेकेदारांवर आणि नगरपरिषद प्रशासनाचे मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. या घटनेनंतर स्थानिक आक्रमक झाले असून नगरपरिषद प्रशासन व सत्ताधारी, स्थानिक लोकप्रतिनिधींविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.










