
सावंतवाडी : पैशांच वारेमाप वाटप होत आहे. हे सगळं विशिष्ट व्यक्तींकडून केलं जात आहे. एवढ्या मोठ्या लोकांनी सिंधुदुर्गात येऊन जिल्ह्याची संस्कृती बिघडण्याचा प्रकार करणं चुकीच आहे. उद्या ही परंपरा होऊन जाणार असून त्यांनी केलं म्हणून इतरांना कराव लागल तर चुकीची स्पर्धा होईल. हा प्रकार थांबला पाहिजे. मात्र, आता समोरच्यांच वाटप पूर्ण होत आलंय. त्यामुळे लोकांनी भाजपचे पैसे स्वीकारून शिवसेनेला मतदान करावं असं आवाहन माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केले.
ते म्हणाले, यातून लोकशाहीची हत्या होत असून आमचे तगडे उमेदवार आहेत तिथे २० हजार वाटले जातात. लोकांनी मात्र विकास कोण करत यांचा विचार करून आम्हाला साथ द्यावी. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाटपाची तुलना होऊ शकत नाही. एका घरात ५ व्यक्ती असल्यास ५० हजार व १० व्यक्तींना १ लाख दिले जात असतील तर कोणाचंही मन चलबिचल होऊ शकत. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर होत आहे. तो देखील माझं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी होत आहे. या प्रकारांची सवय मला नाही. नेमकं आजारपण देखील आलं. तरीही मी बैठका घेत आहे. विकास, शांततेचा विचार करून जनतेन निर्णय घ्यावा. १७-० करताना देखील कधी पैशांचा वापर केला नाही. तेव्हा समोरही पैशांचा वापर करणारे नव्हते. जनतेनं ठरवलं तर विकासाचा विजय होईल. वारेमाप पैसे वाटण्याचा प्रकार थांबवण्याच काम वरिष्ठांनी करायला हवं होतं. एवढे पैसे कशासाठी ? हा प्रश्न निर्माण होते. तसेच आमदारांचा निधीचा कोटा ठरलेला असतो. पालकमंत्री म्हणतील तसंच होईल असं विधान चुकीच आहे. पालकमंत्र्यांचा आदर करतो. पण, हे महायुतीचे पालकमंत्री आहेत. एका पक्षाचे नाहीत. त्यामुळे महायुतीतील निधी वाटपाच्या सुत्राची अंमलबजावणी त्यांनी केली पाहिजे असंही श्री. केसरकर यांनी सांगितले.










