
सावंतवाडी : सावंतवाडी भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन सावंतवाडीत करण्यात आलं. यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, भाजपचे विशाल परब यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज झाले. आम्ही कुणाची जिरवण्यासाठी जमलो नसून विशाल परब यांनी उभं केलेल्या भव्य कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. येणारे दोन महिने जिद्दीने काम करावं लागेल. आपली रेष मोठी करण्याच काम करायचं आहे. दुसऱ्याची रेष पुसायच काम करायचं नाही.
महाविकास आघाडीच सरकार मध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असताना सगळे तुटून पडत होते. जेव्हा विकेट काढायची होती तेव्हा ती त्यांनी काढली. भाजपची ताकद असल्याने स्वबळासाठी कार्यकर्ते इच्छुक आहेत. त्यात काहीही चूक नाही. वर्षभार आपण कार्यक्रम करतो फक्त, निवडणूकीसाठी मैदानात उतरणारा हा पक्ष नाही. त्यामुळे स्वबळावर लढाव अशी भावना कार्यकर्त्यांची आहे. भाजपच्या ताकदीशिवाय कोणीही आमदार होऊ शकला नाही. आम्ही कोणाला डिवचल नाही. वातावरण खराब केलं नाही. ज्यांना मी नगराध्यक्ष केलं ते आता मला आव्हान देऊ लागलेत. विधानसभेला प्यार किया तो डरना क्या, आता हम आपके है कोन ? अशी परिस्थिती झालीय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९० टक्के मतदान खासदार नारायण राणेंना झालं. रत्नागिरीतील परिस्थिती सर्वांना सर्वश्रुत आहे. अरे ला कारे करण्यात माझी पीएचडी आहे. अंगावर केसेस आहेत, आताच ३०७ मधून दोषमुक्तता मिळाली. आम्हाला जनतेसाठी काम करायच आहे. कोणाची जिरवायच काम आम्हाला करायच नाही. सावंतवाडी, वेंगुर्ला, कणकवली, मालवणचा विकास करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे. पालकमंत्री, मुख्यमंत्री, सभापती एकाच विचारचे आहेत. त्यामुळे विकास कुणीही रोखू शकत नाही.
सिंधुदुर्गात उबाठा शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांकडे उमेदवार शिल्लक नाहीत. आमची युती झाली तर कार्यकर्त्यांना न्याय देता येणार नाही. बंडखोरी रोखण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. विरोधकांना लायकीत ठेवायचं असून त्यांना रेडिमेड उमेदवार द्यायचे नाहीत. आम्ही मैत्रीपूर्ण निवडणूक लढवून आम्ही नंतर एकच येणार आहोत. आमचे नेते एकत्र आणणारच आहेत. लोकसभा, विधानसभेची परिस्थिती वेगळी होती. युती करून बंडखोरी झाली तर परवडणार नाही. आमच्या नेत्यांना आम्हाला काय हवंय याची जाणीव आहे. चार वर्ष सरकारची शिल्लक आहेत. २०२९ ला भाजपचा मुख्यमंत्री बसविण्यासाठी सिंधुदुर्गतून मोठी ताकद लावली पाहिजे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी राहायचं आहे.
भाजपला थांबवण्यासाठी आपसात वाद लावण्याच काम होत आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष न देता कमळ चिन्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा, त्यासाठी काम करा. सरकारच्या योजना पोहचवण्यासाठी काम करत असलेल्या विशाल परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो. जन सुविधा केंद्राचा लाभ लोकांना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्गला नंबर वन करण्यात आपण पुढे आहोत. जिल्ह्यातील दोन नंबर धंदे बंद झाले आहेत. हे होत असताना असंख्य माता भगिनी आम्हाला आशीर्वाद देखील देत आहेत. कोणाला प्रवेश आवडेल कोणाला नाही आवडणार आहे. मात्र, पक्ष वाढत असल्यास ती स्वीकारली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. प्रदेशाध्यक्षांची कॉलर टाईट करण्याची जबाबदारी आपली आहे. १०० टक्के निकाल लावून आपल्याला त्यांना गिफ्ट द्यायचं आहे. शतप्रतिशत भाजप जिल्ह्यात करून दाखवा अस आवाहन त्यांनी केलं.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा नेते विशाल परब, माजी आमदार अजित गोगटे, प्रमोद जठार, सौ. वेदिका परब, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, युवराज लखमराजे भोंसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, अशोक सावंत, सुधीर आडिवरेकर, रणजीत देसाई, राजू राऊळ, संदिप गावडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.










