
सावंतवाडी : शहरासह तालुक्यात मंगळवारी सकाळपासून बत्ती गुल्ल झाली आहे. गेले तीन महिने वीजेची समस्या कायम आहे. पाऊस असो वा नसो विजेचा खेळखंडोबा मात्र कायम आहे. सततच्या ये-जामुळे नागरिकांच्या उपकरणांसह आता शासनाच्या सीटीस्कॅन मशीनचा पार्टही बिघडल्याचे समोर येत आहे. अजूनही विजेच्या समस्या कायम असल्यानं उर्जा विभाग नेमकं करतोय काय ? असा सवाल यानिमित्ताने वीज ग्राहक विचारत आहेत.
तालुक्यात वीज वितरण कंपन्यांचा कारभार पूर्णपणे 'रामभरोसे' सुरू आहे. विजेच्या समस्येन व्यावसायिक आणि सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. त्यात मंगळवारी ग्रामीण भागासह शहरात विद्यूत प्रवाह खंडीत झाला. याबाबत विचारलं असता महावितरणचे उप कार्यकारी अभियंता म्हणाले, तांत्रिक बिघाड झाला असल्याने विद्यूत पुरवठा खंडित झाला आहे. बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू असून दीड तासात सेवा पूर्ववत होईल अशी माहिती दिली.
दरम्यान, ३३ केव्ही लाईनमध्ये फॉल्ट आहे. त्यामुळे विद्यूत प्रवाह खंडीत झाल्याचे वीज वितरण कक्षाकडून सांगण्यात आले. सततच्या या बिघाडामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दिवसातून अनेकदा, अगदी पाच-पाच मिनिटांसाठी वीजपुरवठा खंडित होत असल्याने वीजेवर चालणारी यंत्रणा आणि उपकरणे खराब होण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळेच उपजिल्हा रुग्णालयातील सीटीस्कॅन मशीनचा पार्टही बिघडल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या नुकसानीला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.ग्रामीण भागातील परिस्थिती तर आणखीन बिकट आहे. वीज महावितरण खाते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळत असताना वीज वितरण कंपनीचे अधिकारी नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. सततचे तांत्रिक बिघाड बघता उर्जा विभाग नेमकं करतो काय ? असा संतप्त सवाल सामान्यांतून विचारला जात आहे.