सावंतवाडी : आमची महाराष्ट्रात महायुती आहे त्यामुळे विधानसभेत आम्ही काय करणार याची काळजी उबाठाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी करू नये. आघाडी धर्म म्हणून अर्चना घारे तुमच्या प्रचारात उतरल्यात. त्यामुळे हिंमत असेल तर तुम्ही आताच विधानसभेसाठी उबाठा शिवसेनेचा दावा सोडून अर्चना घारे परब यांची उमेदवारी जाहीर करून दाखवा असे आव्हान भाजपचे पदाधिकारी, चराठा उपसरपंच अमित परब यांनी रुपेश राऊळ यांना दिले.उबाठा सेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी तेली व केसरकर यांच्या भूमिकेबाबत केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते बोलत होते.
दुसऱ्यांच्या पक्षात लुडबुड करण्यापेक्षा आपल्या पायाखाली काय जळते याची काळजी राऊळ यांनी करावी असा टोलाही अमित परब यांनी लगावला. गेल्या दहा वर्षात एकही रोजगार आणू न शकणारे विनायक राऊत यांनी गावदौरे करीत खळा बैठका घेतल्या. मात्र, कुठलेही प्रश्न ते मार्गी लावू शकले नाही. हिंमत असेल तर त्यांनी सावंतवाडी तालुक्यातील गावात दिलेल्या विकासनिधीचा हिशोब द्यावा असे आव्हानही त्यांनी दिले. गावागावात फिरूनही जनतेचा प्रतिसाद मिळत नसल्याने उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरु लागली आहे. त्यामुळे माहितीवर टीका करून ते मतदारांचे लक्ष विचलित करू पाहत आहेत. आपला स्वतःचा निधी खर्च न करणारा खासदार आता रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदासंघात नको अशी भावना सर्वांची झाली आहे असा टोलाही अमित परब यांनी लगावला.