
सावंतवाडी : माझ्या आयुष्यातील ही शेवटची निवडणूक आहे. तुमचा जुना सहकारी म्हणून मला मदत करा. मला येणाऱ्या रोज धमक्या बघता माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तुमचं एक मत माझा जीव वाचवू शकतो. या धमक्यांचा जनतेन विचार करावा, माझ्या मुलावर दोन वेळा हल्ले झालेत. हा दहशतवाद मोडायचा आहे तर मला संधी द्या असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी केले. तर, तुमच्यावर जीवावर मी निवडणूक लढवत आहे असे विधान त्यांनी केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राजन तेली म्हणाले, यापुर्वी माझ्या उद्योगधंदे बंद पाडण्याचा व मला आयुष्यातून उठवण्याचा प्रकार घडला आहे. हे सर्व तुमच्या एका मताने बदलू शकते. तुमचं एक मत हे सगळं बदलू शकते. २३ तारीख नंतर तुम्हाला ना राणे विचारणार ना केसरकर विचारणार. मी सर्वांचा आहे. पार्टी म्हणून कधी लागलो नाही.आजवर मी जीवाच रान केल. तुमच्यासाठी रात्रंदिवस काम केलं. त्यामुळे डोळसपणे मतदान करा. मागच्या पंधरा वर्षात आरोग्य, नोकरी, पर्यटन, उद्योगधंदा या आमदारानी आणला नाही. सागर किनारपट्टी असताना मतदारसंघात पर्यटन विकास झाला नाही. केसरकरांच्या विरोधात असणाऱ्या या चिढीतून मतदान करा असे आवाहन राजन तेली यांनी केले. वन संज्ञा प्रश्न अद्याप सुटला नाही. त्याचा पाठपुरावा झाला नाही. त्यामुळे यापुढे या सर्व प्रश्नांवर मी मार्ग काढणार आहे. शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. चिपी विमानतळाच श्रेयवाद घ्यायला सगळे होते. आज जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही. तेथील युवकांची केसरकरांनी फसवणूक केली. सावंतवाडी शहाराचा विकास केला नाही. येथील ड्रेनेज सिस्टीम, कचरा डेपो, अंडरग्राऊंड वीज वाहिनी, नरेंद्र डोंगरावर रोप वे, तलाव सुशोभीकरण, बांदा क्रिडा संकुल केसरकरांच्या आडमुठ्या धोरणामुळे रखडले आहे. मला संधी दिल्यास या प्रश्नासह शेतकरी, बागायतदार, मच्छिमार, जंगली प्राणी प्रश्न हे प्रामुख्याने सोडवेन असं मत श्री. तेली यांनी व्यक्त केले. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उमेश कोरगावकर, इफ्तिकार राजगुरू, आशिष सुभेदार, रमेश गावकर आदी उपस्थित होते