कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रात वाढते सायबर गुन्हे पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 ते 12 वी व्यक्तीच्या मुलांना सायबर सुरक्षे बाबत जनजागृती करावी या हेतूने आम्ही प्रत्येक महाविद्यालयात जात मुलांशी संवाद साधला. यात आम्ही 258 शाळां पर्यंत पोहोचत सायबर सुरक्षा जनजागृती केली. यामुळे आम्ही जिल्ह्यातील 50 हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो आणि या विद्यार्थ्यांमुळे पन्नास हजार कुटुंबीयांपर्यंत पोचलो याचा मला सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी शुक्रवारी सायबर सुरक्षा जनजागृती अभियान सांगता समारंभ प्रसंगी काढले.
ऑक्टोबर महिन्यापासून सायबर सुरक्षे बाबत जनजागृती सिंधुदुर्ग पोलिसांनी पाऊले उचलले होते, यामध्ये जिल्ह्यातील 13 पोलीस स्थानकांनी सहभाग घेतला होता, यात सायबर ठाणे स्थानिक, गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा व मानव संसाधन शाखा, इत्यादी शाखांचे 200 अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते या कार्यक्रमाची सांगता कुडाळ येथील मराठा हॉल येथे संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, अनंत वैद्य, राजन बोभाटे, प्रणय तेली, श्रीराम शिरसाट, ज्येष्ठ वकील अजित भणगे सहभागी झाले होते.
वाढत्या सायबर गुन्ह्याचे प्रमाण पाहता जिल्ह्यात जनजागृती करावी या हेतूने ऑक्टोबर महिन्यापासून जनजागृती करण्यात आली, यात पोलीस प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांचे, सर्व विद्यार्थ्यांसह एमकेसीएलच्या कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो, आपल्यामुळे सिंधुदुर्ग पोलीस पन्नास हजार कुटुंबीयांपर्यंत पोहोचू शकले, असे मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शिक्षक विद्यार्थी यांचेही यावेळी स्वागत करण्यात आले तर देवगड येथील सानवी सावंत हिचा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते सायबर सुरक्षेवर घेण्यात आलेल्या आयक्यू टेस्टमध्ये प्राविण्य मिळवण्याबद्दल गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाची प्रस्तावना सायबर सेलचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी केली, तर एमकेसीएलचे जिल्हा प्रतिनिधी प्रणय तेली यांनी सायबर अवेअरनेस बाबत माहिती दिली. तर या कार्यक्रमात सहभागी उपस्थितांचे पोलीस उपविभागीय अधिकारी किशोर सावंत आभार मानले.