सिंधुदुर्ग : आंदुर्ले गावातील बाबा चव्हाण यांचा ज्येष्ठ सुपुत्र दिपक उर्फ राजा चव्हाण याने महाराष्ट्र सुरक्षा बल भरती प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून तो सेवेत लवकरच रुजू होत आहे. आंदुर्ले गावासाठी ही फार अभिमानाची गोष्ट आहे. लष्करी सेवेत भरती होण्याचे विशेष स्वप्न उराशी बाळगून त्या दृष्टीने अथक परिश्रम आणि सराव परीक्षा यांच्यात सातत्य ठेऊन त्याने आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरविलेले आहे. विशेष म्हणजे केवळ स्पर्धा परीक्षा यातच गुंतून न राहता, गावातच असलेल्या आपल्या वडिलांच्या केशकर्तनालय दुकानात काम करून तो हातभार लावत होता. स्पर्धेसाठी सकाळी लवकर उठून धावणे, नित्य व्यायाम करणे ही दिनचर्या त्याने कधीच खंडित केलेली नव्हती. सराव झाल्यानंतर वडिलांबरोबर सकाळी व संध्याकाळी हातभार लावून दुकानात पुर्णवेळ काम करायचा. केवळ वडिलांना हातभार न लावता अल्पावधीत त्याने केस कापण्याच्या विविध प्रकारात विशेष प्राविण्य प्राप्त केले. एकाग्रता आणि योग्य दृष्टिकोन याचा मिलाप त्याने साधला. स्पर्धा परीक्षेची तयारी आणि आपले काम अशी तारेवरची कसरत करत त्याने करताना लक्ष्य कधीच नजरेआड होऊ दिले नाही. मागील दोन -तीन वर्षे सतत परीक्षा देणे आणि सरावात सातत्य ठेवल्यामुळेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून त्याने आपले लक्ष्य गाठले आहे.