LIVE UPDATES

हत्ती पकड मोहिमेसाठीचं आंदोलन दुसऱ्या दिवशी स्थगित

Edited by: लवू परब
Published on: June 03, 2025 20:01 PM
views 65  views

दोडामार्ग : हत्ती पकड मोहिमेच्या अनुषंगाने मंगळवारी १० जून रोजी मुख्य वनसंरक्षक यांच्यासमवेत हत्ती बाधित ग्रामस्थ व शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली जाईल व वन विभागाने सुरू केलेल्या कार्यवाहीवर चर्चा केली जाईल असे लेखी आश्वासन दिल्याने स्वराज्य सरपंच सेवा संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी सुरू केलेले ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशी मंगळवारी सायंकाळी स्थगित करण्यात आले आहे. ठरलेल्या दिवशी व योग्य वेळी बैठक न झाल्यास तालुक्यात मोठे तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. 

ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस, वैभव इनामदार यांनी यशस्वी शिष्टाई केली.  तिलारी खोऱ्यात मागील २३ वर्षांपासून हत्तींचा उच्छाद सुरू आहे. ८ एप्रिल रोजी मोर्ले येथे एका हत्तीने एका निष्पाप शेतकऱ्याचा बळी घेतला होता. त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले व हत्ती पकड मोहीम राबविण्याची मागणी करत आंदोलन छेडले होते. वनविभागाने देखील ओंकार नामक हत्तीला पकडण्याचा आदेश देत ३० जून पर्यंत ही मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. याला दोन महिन्यांचा कालावधी उलटत आला तरी देखील वनविभागाने कोणतीच कार्यवाही केली नसल्याचा आरोप करत स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी येथील वनविभागाच्या कार्यालयात सोमवारी दुपारी ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. या आंदोलनात दत्ताराम देसाई, पंकज गवस यासह हत्तीबाधित शेतकरी सहभागी झाले.

सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांनी सोमवारी आंदोलनकर्त्यांची भेट घेत चर्चा केली. शिवाय आंदोलन मागे घेण्याचीही विनंती केली. मात्र आतापर्यंत हत्ती पकड मोहीम राबविण्यासाठी वनविभागाने काय काय कार्यवाही केली? याचे समर्पक उत्तर जोपर्यंत मिळत नाही, तसेच दिलेल्या मुदतीत ही मोहीम केव्हापर्यंत राबविणार? याचे उत्तर अधिकाऱ्यांनी न दिल्याने आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले. दुसऱ्या दिवशी मंगळवारी या आंदोलनाला विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सरपंच यांनी भेट देत पाठिंबा दर्शविला. सायंकाळी उशिरा उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिल्याने त्यांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले.

तसेच मंगळवार दिनांक १० जून रोजी आयोजित केलेल्या बैठकीला मुख्य वनसंरक्षक व उपवनसंरक्षक न आल्यास तसेच हत्ती बाधित शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण न केल्यास त्याच दिवशी तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशाराही वनविभागाला देण्यात आला. यावेळी आंदोलकर्ते प्रवीण गवस दत्ताराम देसाई यांसह उबाठा जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, भाजप दोडामार्ग तालुका प्रमुख दीपक गवस, वैभव इनामदार, मोर्ले सरपंचा संजना धुमास्कर, प्रशांत गवस, सुमित गवस, स्वप्नील देसाई आदी उपस्थित होते.