दोडामार्ग : गाव पातळीवर खऱ्या माहितीचा स्रोत हा पोलीस पाटील आहे. त्यामुळे पोलीस पाटीलांनी सतर्क रहावे असे आवाहन दोडामार्गचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी केले. दोडामार्ग पोलीस ठाणे येथे तालुक्यातील पोलीस पाटील आणि शांतता समिती यांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकूर हेही उपस्थित होते.
या बैठकीत पोलीस निरीक्षक श्री. पवार यांनी तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस पाटील यांची भूमिका कशी महत्वाची आहे हे आपल्या मार्गदर्शनात विषद केले. त्यांची जबाबदारी व कर्तव्य त्यांना समजावून सांगितलं. गावातील कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण करेल अशी कोणतीही माहिती आणि प्रासंगिक घटना पोलीस ठाण्यापर्यंत पोलीस पाटील यांनी पोहचवणे आवश्यक आहे याबाबतही माहिती दिली. इतकंच नव्हे तर प्रत्येक गावात जर पोलीस पाटील यांनी जबाबदारी आणि अभ्यासपूर्ण भूमिका बजावली तर प्रत्येक गावात शांतता नांदेल असा आशावाद व्यक्त केला.