
कणकवली : कोरोनानंतर नागरिक महागाईने हैराण झालेले असताना दिवाळी जशी आनंदात साजरी करावी तशी करता येत नाहीय कारण राजकारण खूप वाईट मार्गाने चालले आहे. जनता याला कंटाळली असून सरकारने 100 रुपयांत चार जिन्नस देण्याची घोषणा केली होती ती अजून पूर्ण झाली नाही. दिवाळी आली तरीही रेशन पोहोचलेलं नाही. या फक्त पोकळ घोषणा होत्या. फोटोचे बॉक्स की फोटोच्या पिशव्या छपाव्यात हे ठरत नसल्याने हा घोळ होतोय, अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे.
कणकवली येथील मनसे कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उपरकर बोलत होते. जनतेला कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. आरोग्याच्या तसेच इतर सुविधा त्यांना मिळत नाहीत. घोटाळे करून जनतेचा पैसा राजकारणी आपल्या घराकडे नेतायत. लोकप्रतिनिधींचा यंत्रणेवर वचक राहिलेला नाहीय. आर्थिक घोटाळे करून अधिकारी श्रीमंत होतायत. जिल्ह्याचे पालकमंत्री दोनदा जिल्ह्यात आले तरीही दिवाळी आली तरी खड्डे भरले गेले नाहीत. हे काय नाताळची वाट बघतायत का? जनता न्यायासाठी रस्त्यावर उतरतेय. तरीही तिला न्याय मिळत नाही. संविधान वाचवा, कोणत्यातरी आमदाराला चौकशीपासून मुक्त करा, हे करण्यापेक्षा जनतेचा थोडा विचार करा. सर्वच पक्षांनी जनतेची निराशा केलेली आहे.
ज्याप्रमाणे राज ठाकरे राज्यात आज समांजसपणाचे राजकारण करतायत, त्या समांजसपणाला काहीजण स्क्रिप्ट म्हणतात. मात्र राज ठाकरे हे काम अगदी प्रामाणिकपणे आणि समंजसपणे करत आहेत. त्यांच्यासारखी भूमिका सर्वांनीच घेण्याची गरज आहे. विद्यमान तसेच मागील साऱ्याच सरकारला राज ठाकरेंचे प्रश्न मार्गी लावण्याची गरज वाटली आणि ते त्यांनी मार्गी लावलेले आहेत. ती भूमिका सर्वांनीच घेणे गरजेचे असल्याचे उपरकर म्हणाले.