नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरु

५२५ गावांतील १७ हजार १७२ शेतकरी बाधित
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: November 03, 2025 19:28 PM
views 32  views

सिंधुदुर्गनगरी :   ऑक्टोंबर 2025 मध्ये सततच्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान होत आहे. या नुकसानीच्या बाधित क्षेत्राचे संयुक्त पंचनाचे करण्याचे काम क्षेत्रीय स्तरावर सुरु झाले आहे. प्राथमिक अहवालानुसार 31 ऑक्टोंबर अखेर जिल्ह्यातील 4338 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सदर नुकसान 525 गावामध्ये झाले असून 17172 शेतकरी बाधित झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिली आहे.

ऑक्टोंबर 2025 मध्ये अवकाळी पावसामुळे भात, नाचणी पिक व इतर शेती पिकाचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे क्षेत्रीय स्तरावरील सहायक कृषि अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येत आहेत. ज्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असल्यास त्यांनी संबंधित ग्रामस्तरीय क्षेत्रीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्रीमती नाईकनवरे यांनी केले आहे.