कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनावरे वाहतुकी संदर्भात अनेक गैरसमज व समस्या निर्माण होत असल्याने जनावरे वाहतुक करण्यासाठी शासनाने अधिकृत परवाना द्यावा तसेच जिल्ह्यातील बैल बाजार सुरू करावेत अशी माहिती पत्रकार परिषदेत सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी महासंघाचे पदाधिकारी व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांनी देत शेतकर्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरू असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला.
कुडाळ येथे ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी रूपेश पावसकर, अस्लम शेख, अजिम शेख, अभिषेक वाटवे, चेतन आळवे, नारायण शिरसाट, सर्फराज गोधड, मोहन जोशी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रभुगावकर यांनी सांगितले की, जिल्ह्यातील शेतकर्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी काही दिवसापूर्वी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन पावशी येथे केले होते. तेथे सर्व शेतकर्यांचे प्रश्न समस्या लक्षात घेवुन सर्व पक्षीय पदाधिकार्यांनी एका विचाराने हे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा परिवहन अधिकारी निवेदन दिले आहे.
जिल्ह्यातील शेती ही तुकडा पद्धतीची आहे, त्यामुळे मेकॅनिझेशनने व यांत्रिकीकरणाने शेती करणे शक्य नसल्यामुळे शेतीपासून अनेक शेतकरी दूर जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये जे काही शेतकरी छोट्या प्रमाणात आहे त्यांच्यासाठी शेतीला लागणार्या जनावरांच्या वाहतुकीचा जो प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी बऱ्याच माध्यमातून असेल किंवा अन्य काही गोष्टीमुळे असेल काही लोक ती जनावर वाहतूक करते वेळेस ती कत्तलखान्याला जातात अशा पद्धतीचा गैरसमज करून काही ठिकाणी उतरवून घेतात, पोलिस प्रशासन गुन्हे दाखल करतात.
यामुळे शेतकऱ्यांना त्रास होतो आहा, जिल्ह्यात बाहेरून जनावरे आणता येत नाहीत, जिल्ह्याचे दुग्धोत्पादन कसे वाढणार? असा प्रश्न उपस्थित करीत, जनावरे वाहतुक करणे सोयीचे व्हावे या करीता प्रशासनाने वाहतुक परवाना द्यावा असे सांगितले.
चौकड- विलास कुडाळकर यांचे अभिनंदन- संग्राम प्रभुगावकर
जिल्ह्यात दोन ते तीन ठिकाणी गुरांचे बाजार भरवले जात होते परंतु ते बंद आहेत. त्यापैकी कुडाळ शहरात बैल विक्री बाजार पूर्ववत सुरू करण्यासाठी नगरसेवक विलास कुडाळकर यांनी पुढाकार घेत पाठपुरावा केला. त्यामुळे नगरपंचायतीने परवानगी दिली आहे. आता लवकरच कुडाळात हा बैल बाजार सुरू होणार असून, याबद्दल न.पं. आणि नगरसेवक विलास कुडाळकर यांचे अभिनंदन शेतकऱ्यांच्या व महासंघाच्या वतीने संग्राम प्रभुगावकर यांनी केले.