LIVE UPDATES

जिंकायचे असेल तर प्रथम मनाने हरायचे नाही : आमदार निलेश राणे

Edited by: विनायक गांवस
Published on: June 08, 2025 12:14 PM
views 133  views

सावंतवाडी : जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रथम ध्येय निश्चित कराव. ध्येयपूर्तीचे वेड कायम मनात ठेवा. जिंकायचे असेल तर सर्वप्रथम मनाने हरायचे नाही, खचायचे नाही. करियर निवडीसाठी आई-वडिलांचे, त्याचबरोबर आपल्या मनाचेही ऐका. आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याचा ध्यास ठेवून त्यादृष्टीने प्रयत्न करा आणि आपल्या जिल्ह्याचे नाव उज्वल करा असे प्रतिपादन कुडाळ मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी केले. सावंतवाडी येथील गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते.

सकल मराठा समाज सावंतवाडी यांच्यावतीने विविध परीक्षांमध्ये यश संपादन केलेले विद्यार्थी तसेच सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचा सत्कार सोहळा भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. आ. निलेश राणे यांच्या हस्ते विद्यार्थी व विविध क्षेत्रात योगदान दिलेल्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी नगरसेवक खेमराज कुडतरकर, आंबोली शिवसेना विभाग प्रमुख दिनेश गावडे, सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सिताराम गावडे, प्रा. सतीश बागवे, प्रसाद परब, केसरी सरपंच राघोजी सावंत आदी उपस्थित होते.

आ. राणे म्हणाले, जगविख्यात मुष्टीयुद्धा माइक टायसन यांनी जीवनात ४९ लढती पैकी ४३ लढती नॉट आऊट मध्येच जिंकल्या. जिंकायचेच आहे असे मनात विचार घेऊन उतरल्यानंतर त्यांनी सर्व सामने जिंकले. मात्र, ज्यावेळी नकारात्मक विचार आला ते सामने हरले. यावरून जर आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर सकारात्मक विचार कायम ठेवले पाहिजेत. जीवनात कधीही खचायचे नाही.

समाजाचे आपण देणे लागतो हे कायम लक्षात ठेवा. समाज आपलं काहीही देणे लागत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, गडकिल्ले याचा विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे. महाराजांबद्दल बऱ्याच गोष्टी आपल्याला अद्यापही माहित नाहीत. अनेक गोष्टी कळल्याच नाहीत. महाराजांचा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने डॉक्टर, इंजिनियर्स झाले पाहिजे असे काही नाही. आपली आवड कोणत्या क्षेत्रात आहे ते ओळखा. त्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा. आई-वडिलांपेक्षा मोठे दैवत आणखी कोणीही नाही. त्यांच्यावर प्रेम करा त्यांचा आदर ठेवा. जीवनात नक्की यशस्वी व्हाल, असा मूलमंत्रही त्यांनी दिला.

संजू परब म्हणाले, माझ्या राजकीय जीवनात आ. निलेश राणे यांनी उभारी दिली. त्यांच्या पाठिंब्यावर मी अनेक पदे उपभोगली. गेली सोळा वर्षे मी त्यांच्याबरोबर काम करत आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे सांगितले. प्रास्ताविकात अध्यक्ष सिताराम गावडे यांनी सकल मराठा समाज या संस्थेच्या कार्याची माहिती दिली. यावेळी डॉ. लवू सावंत, सूरज लाड, सातोळी बावळट सरपंच सोनाली परब, उपसरपंच स्वप्नील परब, संतोष सगम, एकनाथ दळवी (विलवडे), क्रीडा प्रशिक्षक अरुण घाडी, गोरक्षक दिनेश गावडे,  राघोजी सावंत,देवसू येथील मंथा सावंत सोनू दळवी, दोडामार्ग प्रवीण गवस,सरपंच सेवा संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस (दोडामार्ग), हनुमंत सावंत (देवसू), साईश गावडे, वीज ग्राहक संघटना तालुकाध्यक्ष संजय लाड, दीपेश शिंदे, नंदकिशोर दळवी (विलवडे), पांडुरंग गावडे (चौकुळ), प्रा. सतीश बागवे, आस्था लोंढे, दिनेश गावडे (चौकुळ) तसेच आरोग्यदूत धोंडी अनावकर, संतोष जाधव, तुकाराम जाधव, सुनील पाटील, अजय कदम यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन व आरोग्य दूताना रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जय भोसले यांनी केले. आभार साईश गावडे यांनी मानले.